नवी दिल्ली : पाकिस्तानकडून भारताविरोधात अनेक देशांना खोटी माहिती पसरवली जात आहे. भारत येत्या काळात आपल्यावर मिसाईल हल्ला करणार असल्याची खोटी माहिती पाकिस्तान पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.


पाकिस्तानने काही राष्ट्रप्रमुखांना फोन करुन तशी माहिती दिली आहे. तसंच भारतीय नौदलाच्या हालचालीबाबतही पाक खोटी माहिती पसरवत असल्याचं भारत सरकारने म्हटलं आहे. पाकिस्तानातील काही भागात आणीबाणीसदृश स्थिती निर्माण करुन युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्याचं भासवलं जात आहे. भारताने पी फाईव्ह राष्ट्रांना फोन करुन परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, पाकिस्तानची 20 विमानं भारताच्या अवकाश हद्दीत घुसली होती. भारतीय लष्करी तळावर हल्ला करण्याचा पाकिस्तानी विमानांचा प्रयत्न होता, अशी माहिती भारत सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानी जेट पाडतानाचा व्हिडिओ भारताच्या हाती असल्याची माहिती आहे. पाकिस्तानने याची कबुली देण्याची भारताला प्रतीक्षा आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडरच्या सुटकेसाठी भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. कुठल्याही अटी-शर्तीविना भारतीय विंग कमांडरला भारताकडे सोपवा, असं भारताने पाकिस्तानला बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काही अटींवर आम्ही भारतीय विंग कमांडरची सुटका करण्यास तयार असल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितलं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चेची तयारी दाखवल्याचंही पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने भारताला कळवलं आहे. मात्र विंग कमांडरच्या सुटकेसाठी कुठलीही सौदेबाजी चालणार नसल्याचं भारत सरकारनं ठणकावलं आहे.