मुंबई : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपा प्रकरणी मी निर्दोष असून मी माझ्या आरोंपावर ठाम असल्याचं स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी कोर्टात दिलं आहे. या प्रकरणी मुंबईतल्या माझगावं महानगर दंडाधिकारी यांच्या कोर्टाने 15 हजारांच्य़ा जातमुचलक्यावर राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला.


काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी 15 हजारांचा जामीन भरला. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची विचारसरणी कारणीभूत असल्याचं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं होतं. याच विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे कार्यकर्ते आणि वकील दृतीमन जोशी यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. याच प्रकरणाची सुनावणी आज शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात घेण्यात आली.



राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे कार्यकर्ते आणि वकील दृतीमन जोशी

ही विचारधारेची लढाई आहे. मी गरीब, शेतकरी, मजूर यांच्यासोबत उभा आहे. आक्रमण होतंय, मजा येतेय. ही लढाई मागील पाच वर्ष जशी लढलो, तशी पण दहापटी आणखी जोमाने लढणार आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी कोर्टाबाहेर आल्यानंतर माध्यमांसमोर दिली.

Rahul Gandhi in Mumbai | राहुल गांधींची आज मुंबईच्या शिवडी कोर्टात हजेरी | ABP Majha



काय आहे प्रकरण?                            

गौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या कडव्या विरोधक होत्या. गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधींनी संघ आणि भाजपवर निशाणा साधला. ‘भाजपच्या विचारसरणीविरोधात बोलणाऱ्या, संघाची विचारसरणी आवडत नसलेल्या व्यक्तींवर दबाव आणला जातो. अशा व्यक्तींवर हल्ले केले जातात, अशी ट्वीट राहुल गांधी यांनी केली होता.

राहुल गांधी यांनी राजीनामा परत घ्यावा, कार्यककर्त्यांच्या कोर्टाबाहेर घोषणाबाजी

राहुल गांधींनी अधिकृतरित्या आपल्या काँग्रेसचं अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. राहुल गांधी शिवडी कोर्टाच्या बाहेर दाखल होताचं कोर्टाबाहेर कार्यकर्त्यांनी समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु केली आहे.

राहुल गांधी यांनी राजीनामा परत घ्यावा म्हणून कोर्टाच्या बाहेर कार्यककर्त्यांना घोषणाबाजी केल्या. तसेच राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ नये, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सांगितलं.