NMP Issue: नॅशनल मोनेटाइजेशन पाईपलाईन (NMP) वरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. आज त्यांनी ट्विटरवर #IndiaOnSale या हॅशटॅगसह लिहलंय, की "सर्वात आधी विश्वास विकला आणि आता.." याआधी मंगळवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 70 वर्षात जनतेच्या पैशाने बनवलेली देशाची संपत्ती त्यांच्या काही उद्योगपती मित्रांना विकत आहेत. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. 


एका प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या, की "त्यांना (राहुल गांधी) मोनेटाइजेशन समजते का? काँग्रेसनेच देशाची संसाधने विकली आणि त्यात लाच घेतली." त्या म्हणाल्या की, काँग्रेस सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे 8,000 कोटी रुपये उभारण्यासाठी मोनेटाइजेशन केलं, 2008 मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकासाठी प्रस्ताव मागवण्या आले होते.


निर्मला सीतारामन म्हणाल्या, "जर ते खरोखरच मुद्रीकरणाच्या विरोधात होते, तर राहुल गांधींनी NDLS च्या मुद्रीकरणासाठी RFP का नाही फाडले? जर ते मुद्रीकरण असेल तर त्यांनी नवी दिल्ली रेल्वे स्टेशन विकले का? त्याची मालकी आता भाऊजीकडे आहे का? मुद्रीकरण म्हणजे काय हे त्यांना माहीत आहे का? त्यांनी काँग्रेसला कॉमनवेल्थ गेम्सचीही आठवण करून दिली.




सीतारामन म्हणाले की मालमत्ता मुद्रीकरण योजनेत मालमत्तांची विक्री समाविष्ट नाही. मालमत्ता सरकारला परत दिली जाईल.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी 6 लाख कोटी रुपयांच्या NMP ची घोषणा केली होती. या अंतर्गत, पॅसेंजर गाड्या, रेल्वे स्टेशन ते विमानतळ, रस्ते आणि स्टेडियमचे मुद्रीकरण समाविष्ट आहे. सरकार म्हणते की या इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये खाजगी कंपन्यांना सामील करून संसाधने एकत्रित केली जातील आणि मालमत्ता विकसित केली जाईल.


याबाबत राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, या मालमत्ता तयार करण्यासाठी 70 वर्षे लागली आहेत आणि त्यामध्ये लाखो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता ते तीन-चार उद्योगपतींना भेट म्हणून दिले जात आहेत.


राहुल गांधी म्हणाले, आम्ही खाजगीकरणाच्या विरोधात नाही. आमच्या काळात खाजगीकरण विवेकी होते. त्यावेळी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या मालमत्तांचे खासगीकरण करण्यात आले नव्हते. आम्ही ज्या उद्योगांमध्ये खूप नुकसान होते, त्यांचे आम्ही खासगीकरण करायचो.