नवी दिल्ली : इराणचे माजी प्रमुख अय्यातुल्ला खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांचं मूळ लखनऊ जवळचे आहे, याची माहिती त्यांनी आपल्याला दिली होती अशी आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितली. मराठी माणसाचा साधेपणा आणि स्पष्टपणा दिल्लीत नाही, इकडे भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात असंही गडकरी म्हणाले. देशाच्या सहमहालेखा नियंत्रक सुप्रिया देवस्थळी यांच्या 'दिल्ली डायरी' या पुस्तकाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी नितीन गडकरी यांनी त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. 

दिल्लीत कशाचेही डुप्लिकेट असू शकते, नितीन गडकरींचेही ते डुप्लिकेट बनवू शकतात अशी मिश्कील टिप्पणी गडकरींनी यावेळी केली. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी हसून दाद दिली. 

नितीन गडकरी म्हणाले की, "भारत विकसित करत असलेल्या छाबाहार बंदराच्या कामासाठी इराणला जायचो त्यावेळी अय्यातुल्ला खामेनी यांची भेट व्हायची. एका भेटीवेळी खामेनी यांनी सांगितलं की, त्यांची पर्शियन भाषा ही संस्कृतमधून आली आहे. तसेच त्यांचे मूळ हे लखनऊ जवळ असल्याचंही खामेनी म्हणाले होते."

अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींचे हे वक्तव्य भारत आणि इराणमधील सांस्कृतिक संबंधांची आठवण करून देणारे आहे.

Nitin Gadkari On Delhi Politics : दिल्लीत पाय खेचतात

नितीन गडकरी म्हणाले की, "मला कधीच दिल्लीत राहायची इच्छा झाली नाही. एकाने त्याचं कारण विचारलं. त्यावर, तिथे आलू पराठाशिवाय काहीच मिळत नाही असं मी सांगितलं. मराठी माणसाचा साधेपणा, स्पष्टपणा दिल्लीत नाही. इकडे भाऊ भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात."

Nitin Gadkari Speech : मराठी लोक दिल्लीत येत नाहीत

मराठी सस्कृती चांगली आहे. पण काही गोष्टीत आपण विचार करायला पाहीजे. फुले, शाहू, आंबेडकर यांनी राज्याला दिशा दिली. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळकांनी दिशा दिली. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचं महत्त्व महाराष्ट्राबाहेर राहिल्यावर लक्षात येतं, असं गडकरी म्हणाले. 

नितीन गडकरी म्हणाले की,  "मराठी माणसाची विशेषता आणि मानसिकता मर्यादीत आहे. दिल्ली आणि मुंबईतील भौगोलिक अंतर किती आहे त्यापेक्षा मानसिकता महत्त्वाची आहे. मराठी लोक दिल्लीत येत नाही, अधिकारी दिल्लीत येत नाहीत. मुंबईत येण्याचा रस्ता आहे, पण परत जाण्याचा नाही. कोणीही मुंबईत आला की तो परत जात नाही."

ही बातमी वाचा: