मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए कोर्टाचे न्यायाधीश पाडाळकर यांनी हा अर्ज फेटाळून लावला. सोमवारच्या सुनावणीत साध्वी वगळता लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितसह मालेगाव ब्लास्ट केसमधील अन्य सर्व आरोपींनी खटल्यासाठी कोर्टात हजेरी लावली होती.
'मालेगाव ब्लास्ट केसमधील आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा तरी कोर्टात हजेरी लावावी', खटल्यादरम्यान रिकाम्या कोर्टरुमकडे पहात न्यायाधीश विनोद पाडाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या सुनावणीसाठी सतत या ना त्या कारणाने जामिनावर बाहेर असलेले आरोपी सुनावणीसाठी गैरहजर असतात. आणि मग त्यांचे वकील अनुपस्थितीचा अर्ज सकाळी 11 वाजता कोर्टापुढे सादर करतात. मात्र यापुढे 'सबळ कारणाशिवाय गैरहजर राहणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याचा कोर्टाला अधिकार आहे, हे ध्यानात असू द्या' या शब्दांत कोर्टानं आरोपींच्या वकीलांना सुनावलं होतं.
मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरण
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास 100 जण जखमी झाले होते. मालेगावात एका बाईकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर स्फोटासाठी आरडीएक्स पुरवणं आणि कट रचल्याच्या आरोपाखाली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदिप डांगे यांच्याविरोधात गंभीर आरोपांअंतर्गत खटला सुरु आहे.