चंदीगड : स्वातंत्र्योत्तर काळात भारतात जे पंतप्रधान झाले, त्यापैकी नरेंद्र मोदी हे सर्वात वाईट पंतप्रधान आहेत. असे प्रतिपादन पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले आहे. नुकतेच एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी 1984 च्या शीख दंगलींबाबत बोलले होते. तसेच कर्जमाफी आणि 1884 च्या दंगलींवरुन मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला होता. त्यावर अमरिंदर सिंह यांनी आज उत्तर दिले.


सिंग म्हणाले की, "जुमलेबाज पंतप्रधानांनी देशाला अधोगतीकडे नेले आहे. आता देशाचे नागरिक त्यांना सत्तेतून हटवण्याच्या तयारीत आहेत". सिंग यांनी मोदींना आव्हान दिले आहे की, गेल्या पाच वर्षांत मोदींनी जी आश्वासने दिली त्यापैकी पूर्ण केलेलं एक आश्वासन सांगावं.

मोदींनी गुरुदासपूर येथे आयोजित रॅलीदरम्यान काँग्रेसवर सडकून टीका केली होती. याबाबत बोलताना सिंग म्हणाले की, "मोदींनी जुमलेबाजी करत, देशाला धोका देत देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी पाच वर्षात चांगली कामे केली नाहीत, ते केवळ जुमलेबाजी करत राहीले. हे आता लोकांनाही कळले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोदी लोकांकडे कोणत्या तोंडाने जातील हा एक प्रश्नच आहे. असेही सिंह म्हणाले.

गुरुदासपूर रॅलीदरम्यान मोदी काय म्हणाले होते?
कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन मोदींनी काँग्रेसला टार्गेट केले होते. मोदी म्हणाले होते की, "काँग्रेसने पूर्वेकडील राज्यांमध्ये कर्जमाफी केली होती. परंतु त्या ठिकाणी जे लोक शेती करत नाहीत अशा लोकांचे कर्ज माफ करण्यात आले. काँग्रेसने देशाला अनेक वर्षे लुटलं आहे. काँग्रेस आत्तादेखील कर्जमाफीच्या नावाखाली देशाला लुटण्याच्या तयारीत आहे.