नवी दिल्ली : द्रमुकचे सर्वेसर्वा आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 94 व्या वर्षी तामिळनाडूतील कावेरी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. चित्रपटांपासून सुरु होऊन मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचलेला करुणानिधी यांचा प्रवास अत्यंत रंजक आहे.


चित्रपटातून राजकारणाकडे वळण्याचा ट्रेण्ड दक्षिण भारतात जुना आहे. करुणानिधी यांनी तामिळ मनोरंजनविश्वात नाटककार आणि पटकथा लेखक म्हणून काम केलं आहे. करुणानिधींच्या चाहत्यांनी त्यांना 'कलैनर' हे नाव बहाल केलं आहे. कलैनर म्हणजे तामिळ भाषेत कलेतील विद्वान.

करुणानिधी पाच वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत, तर बारा वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. भारतीय राजकारणात करुणानिधी यांना अनन्यसाधारण स्थान आहे.

बालवयात राजकारणात प्रवेश

करुणानिधी यांनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. दक्षिण भारतातील हिंदी विरोधी आंदोलनात ते सहभागी झाले होते. 1937 मध्ये शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य केल्याने युवकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता.

करुणानिधी यांनी तामिळ भाषेतच नाटकं लिहिण्यास सुरुवात केली. तामिळ भाषेवरील त्यांचं प्रभुत्व पाहून सामाजिक नेते पेरियार आणि द्रमुकचे तत्कालीन प्रमुख अन्नादुराई यांनी त्यांना 'कुदियारासु' वाहिनीचे संपादक केलं.

पेरियार आणि अन्नादुराई यांच्यात मतभेद झाल्यानंतर करुणानिधी अन्नादुराई यांच्यासोबत गेले. त्यानंतर करुणानिधींना मागे वळून पहावं लागलं नाही.

नेहरु पंतप्रधान असताना पहिल्यांदा आमदार

तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील कुलिथालाई विधानसभा क्षेत्रातून करुणानिधी 1957 साली पहिल्यांदा निवडून आले. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरु भारताचे पंतप्रधान होते.

करुणानिधी 1961 मध्ये द्रमुकचे कोषाध्यक्ष झाले. 1962 मध्ये ते तामिळनाडू विधानसभेत विरोधीपक्षाचे उपनेते झाले. 1967 मध्ये द्रमुक सत्तेत येताच त्यांना सार्वजनिक कार्यमंत्री झाले.

द्रमुकची धुरा

करुणानिधी यांनी 1969 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच वर्षी द्रमुकचे संस्थापक सीएन अन्नादुराई यांचं निधन झाल्यावर पक्षाचं नेतृत्व करुणानिधींकडे सुपूर्द करण्यात आलं.

करुणानिधी पहिल्यांदा (1969) आणि दुसऱ्यांदा (1971) तामिळनाडूचे सीएम झाले, त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी तिसऱ्यांदा (1989) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा राजीव गांधी पीएम होते. चौथ्यांदा (1996) करुणानिधी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले, तेव्हा नरसिम्हा राव पंतप्रधानपदी होते. तर पाचव्यांदा (2006) करुणानिधींनी तामिळनाडूचं मुख्यमंत्रिपद स्वीकारलं तेव्हा देशाची धुरा मनमोहन सिंग यांच्या खांद्यावर होती.

कौटुंबिक जीवन

करुणानिधी यांचं तीन वेळा लग्न झालं. त्यांची पहिली पत्नी पद्मावती यांचं निधन झालं. एमके मुथू हे त्यांचे सुपुत्र. दुसरी पत्नी दयालु अम्माल यांच्यापासून एमके अलागिरी, एमके स्टॅलिन, एमके तमिलरासू हे पुत्र आणि सेल्वी ही कन्या आहे. तिसरी पत्नी रजति अम्मालपासून कनिमोळी ही कन्या आहे.