Satyapal Malik : शेतकरी आंदोलनासह अनेक मुद्द्यांवर मोदी सरकारला खडे बोल सुनावत बेजार करून सोडलेले मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक ३० सप्टेंबर रोजी पदावरून निवृत्त होत आहेत. भविष्यात निवडणुकीच्या राजकारणात सहभागी होणार नसले, तरी चळवळीशी जोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांची भविष्यात पुस्तक लिहिण्याचीही इच्छा आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत सत्यपाल मलिक म्हणाले की, ते पद सोडताच सीबीआय या प्रकरणी त्यांची चौकशी करू शकते.


मेघालयचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गतवर्षी 17 मार्च रोजी केलेल्या वक्तव्याने बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी मलिक यांनी देशाच्या राजधानीत कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले होते. ते म्हणाले होते की, कुत्री मेली तरी नेते शोक करतात पण इथे 250 शेतकरी मेले आणि कोणी काही बोलायला तयार नाही. केंद्रातील मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात चार राज्यांमध्ये सत्यपाल मलिक यांची बदली करण्यात आली आहे. 


मलिक यांनी सीबीआय तपासावरही भाष्य केले


जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना सत्यपाल मलिक यांना लाच देऊ करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआय तपास करत आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना मलिक म्हणाले की, मी यावर अजून काहीही बोलणार नाही. निवृत्तीनंतर ते सीबीआयला याबाबत सांगतील.


अचानक झालेल्या बदल्यांवर मी निवृत्तीनंतर बोलेन


दैनिक भास्करशी झालेल्या संवादात सत्यपाल मलिक यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 30 सप्टेंबर रोजी राज्यपाल पदावरून निवृत्त होत असलो, तरी सक्रिय राजकारणात येण्याऐवजी आपण चळवळीत उतरू इच्छितो, असे ते म्हणाले. पुस्तक लिहिण्याबाबतही ते बोलले. मोदींच्या कारकिर्दीत चार राज्यांतील बदल्यांवर मलिक म्हणाले की, मला यावर आत्ताच काही बोलायचे नाही, मात्र निवृत्तीनंतर यावर बोलू.


तर मोदी सरकारचा शेतकऱ्यांनी जयजयकार केला असता 


शेतकरी आंदोलनादरम्यान सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. एका प्रश्नाच्या उत्तरात मलिक म्हणाले की, मी कोणत्याही विरोधात बोललो नाही. माझा मुद्दा समजला असता, तर आज शेतकऱ्यांनी त्यांचा जयजयकार केला असता. मात्र, सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.