Manipur : मणिपुरात राष्ट्रपती राजवट (President rule) लागू करण्याला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव लोकसभेत (Lok Sabha) मंजूर करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटानेदेखील (Shiv Sena UBT) मणिपुरात राष्ट्रपती राजवटीला पाठिंबा दिला आहे. तर अमित शाह हे खंबीर गृहमंत्री आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अमित शाह (Amit Shah) यांचे कौतुक केले. मणिपुरात झालेला प्रकार हा दहशतवादाचेच रूप आहे, असा हल्लाबोल अमित शाह यांनी केला आहे. तसेच, या हिंसाचारावरून राजकारण करू नये, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रात्री 1 वाजून 59 मिनिटांनी मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव ठेवला. यावेळी अमित शाह म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर जातीय हिंसा भडकली. या दंगली नाहीत किंवा हा दहशतवाद नाही. उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा अर्थ लावण्यावरून दोन समुदायामध्ये जातीय हिंसा झाली. सर्वांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. मणिपुरात गेल्या चार महिन्यांपासून हिंसाचार झालेला नाही. मणिपूरमधील परिस्थिती समाधानकारक आहे असे मी म्हणणार नाही, पण ती नियंत्रणात आहे. काँग्रेसकडे इतके खासदार नाहीत की ते अविश्वास प्रस्ताव मांडतील. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार सर्व शक्य पावले उचलत आहे, असे ते म्हणाले.
हिंसा व्हायलच नको : अमित शाह
अमित शाह पुढे म्हणाले की, मणिपूर हिंसाचारात 260 लोकांचा मृत्यू झाला आहे. औषधे आणि जेवणाची व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. टेक्निकल, वैद्यकीय शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. प्राथमिक शिक्षणासाठी वर्ग लावले आहेत. जातीय हिंसा होते तेव्हा हे प्रश्न उपस्थित होतात. याला पक्षाशी जोडू नका. मणिपूरमध्ये 1993 साली कुकी-नागा यांच्यात जातीय संघर्ष झाला. हा संघर्ष पाच वर्षे सुरू राहिला. पुढे एक दशक छोट्या मोठ्या घटना सुरू होत्या. आम्ही असे नाही म्हणत की, तुमच्या काळात जास्त झालं, आमच्या काळात कमी झालं, पण हिंसा व्हायलच नको, असे त्यांनी म्हटले.
राष्ट्रपती राजवटीला ठाकरे गटाचा पाठिंबा
यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, मी बोलायला उभा राहतो तेव्हा खूप व्यथित होतो. आम्ही मणिपूरला गेलो, तेव्हा गोगोई आमच्या सोबत होते. तेव्हा महिला राज्यपालांनी हतबलता प्रकट केली होती. सीमावर्ती राज्याला छेद दिला आहे. प्रधानमंत्री तिथे कधी गेले नाहीत. आम्ही राष्ट्रपती राजवटीचे समर्थन करतो, असे त्यांनी यावेळी म्हटले.
सुप्रिया सुळे यांनी केले अमित शाह यांचे कौतुक
तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्हाला गृहमंत्र्यांकडून जास्त अपेक्षा आहेत. अमित शाह हे खंबीर गृहमंत्री आहे. त्यांनी काश्मीरमध्ये सुपीरिअर रिझल्ट्स दिले. पण, मणिपूरवर समाधान नाही. सरकार एक देश एक निवडणुकीवर चर्चा करत आहे. पण राष्ट्रपती राजवट लावावी लागते हे सशक्त लोकशाहीसाठी चांगले नाही. अमित शाह खंबीर आहेत, त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे की मणिपूरमध्ये आपण शांतता प्रस्थापित कराल, असे त्यांनी यावेळी म्हटले. यानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचे अनुमोदन करणारा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला.
आणखी वाचा