मुंबई : अभिमान वाटावा अशा क्षेत्रात महाराष्ट्राने गौरवशाली कामगिरी केलेली असतानाच नको वाटणाऱ्या यादीतही राज्याने वरचा क्रमांक पटकावला आहे. रस्ते आणि रेल्वे अपघातांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर असल्याची आकडेवारी समोर आली आहे.


2015 या वर्षातील आकडेवारीवर नजर टाकली असता, रस्ते आणि रेल्वे अपघातात बळी पडलेल्यांची संख्या महाराष्ट्रात कमालीची जास्त आहे. 2015 मध्ये तब्बल 18 हजार 404 जणांना अशा अपघातांत मृत्यूने गाठलं असून त्यामुळे महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर गेला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद झाली आहे.

2015 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक (23 हजार 219) अपघातबळी गेले असून तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू (17 हजार 376) राज्य आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने ही आकडेवारी जारी केली आहे. रस्ते, रेल्वे आणि रेल्वे क्रॉसिंगवरील अपघातात बळी गेलेल्यांची नोंद यात करण्यात आली आहे. 'वाहतूक अपघात' असं त्यांना संबोधलं जातं.

2015 मध्ये देशभरात एकूण 4 लाख 96 अपघात झाले. त्यामध्ये 1 लाख 77 हजार 423 नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 4 लाख 86 हजार व्यक्ती जखमी झाल्या. 2014 च्या तुलनेत या आकडेवारीत 3.1 टक्क्यांनी (4.81 लाखावरुन 4.96 लाखावर) वाढ झाली आहे. दुचाकी अपघातात बळी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.