मुंबई : कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगालची सत्ता ममता बॅनर्जी यांच्या हातून काबीज करण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून त्यासाठी आता महाराष्ट्र भाजपही कामाला लागल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र भाजपनेही आता ‘मिशन बंगाल’ सुरू केलं असून त्यासाठी अनेक पदाधिकारी कामाला लागल्याचं चित्र आहे. याचाच भाग म्हणून 17 एप्रिल रोजी भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पश्चिम बंगालसाठी विशेष रेल्वे निघणार आहे.
देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालची निवडणूक 23 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा दोन टप्प्यात पार पडणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील भाजप सेल सक्रिय झाल्याचं चित्र आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यासह अनेक वरिष्ठ नेते पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी जाणार आहेत.
पश्चिम बंगालसाठी विशेष रेल्वे
पश्चिम बंगालमधील अनेक लोक हे महाराष्ट्रातील मुंबई-पुण्यासह अनेक शहरात कामासाठी आले आहेत. त्यामध्ये असंघटित क्षेत्रातल्या लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे या असंघटित कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भाजपने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 18 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन विशेष रेल्वे पश्चिम बंगालसाठी निघणार आहे. मुंबई, पुण्यातील जवळपास 7 हजार मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकीचे वेळापत्रक
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.
पहिला टप्पा : 23 एप्रिल
दुसरा टप्पा : 29 एप्रिल
निकाल : 4 मे 2026
बंगालसाठी भाजपच्या यांच्या घोषणा
- प्रत्येक गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेळी कर्करोग तपासणी आणि रुग्णालयीन सुविधा पुरवल्या जातील.
- आम्ही पहिल्या सहा महिन्यांत समान नागरी संहिता (UCC) लागू करू. आम्ही सर्व नागरिकांसाठी एकच कायदा असेल हे सुनिश्चित करू.
- बंगालची सीमा गायींच्या तस्करीचा मार्ग बनली आहे. आम्ही घुसखोरी थांबवू आणि गायींच्या तस्करीला कायमचा आळा घालू.
- बेरोजगार तरुणांना दरमहा ₹3000 ची मदत दिली जाईल.
- आम्ही टीएमसीच्या भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करू. ज्यांनी सरकारच्या पैशाचा प्रत्येक पैसा हडपला आहे, त्यांना तुरुंगात पाठवले जाईल.
- कायदा आणि सुव्यवस्थेवरील श्वेतपत्रिकेचे दोन भाग असतील. पहिल्या भागात कायदा आणि सुव्यवस्था कशी ठप्प झाली आहे, हे स्पष्ट केले जाईल आणि दुसऱ्या भागात त्यात कशी सुधारणा केली जाईल, हे स्पष्ट केले जाईल.
- महिलांच्या सुरक्षेसाठी एक स्वतंत्र पथक तयार केले जाईल.
- धान्य, बटाटे आणि आंबे यांसारख्या पिकांसह शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, यासाठी एक योजना सुरू केली जाईल.
- धान 3100 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केले जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांना ते कमी दरात विकावे लागणार नाही.
- पहिल्या 100 दिवसांत एक आराखडा प्रसिद्ध केला जाईल. आवश्यक पायाभूत सुविधा आणि योजनांच्या माध्यमातून बंगालचा विकास केला जाईल.
ही बातमी वाचा:
