Maharashtra Corona Update : देशात कोरोनाचे आकडे आटोक्यात असले तरी अद्याप कोरोनाचा धोका पूर्णपणे कमी झालेला नाही. कोरोनाचे आकडे कमी होत असले तरी आता टेस्टिंग कमी होत असल्यानं केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त केली जात आहे. कोव्हिड टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं आहे.  महाराष्ट्रासह काही राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पत्र पाठवून कोरोना टेस्टिंग वाढवण्याबाबत आवाहन केलं आहे. 


देशात रोज सरासरी 10 हजार 195 कोविड केसेस येत आहेत, अशातच टेस्टिंग कमी होत आहे.  देशात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण जरी होत असले तरी जगातील काही देशांमध्ये चौथी आणि पाचवी लाट बघायला मिळत आहे.  त्यामुळे टेस्टिंगचा रेट वाढवण्यावर भर देण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मागणी केली आहे. 




या राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पत्र
कोव्हिड टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्याचं आवाहन करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सचिवांनी महाराष्ट्रासह नागालॅंड, सिक्किम, केरळ, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि लद्दाखला पत्र पाठवलं आहे. 


देशात दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) घटल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच दैनंदिन रुग्णसंख्येतही कमालीची घट पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव घटला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 283 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 437 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात एक लाख 11 हजार 481 सक्रिय रुग्ण आहेत. 


आतापर्यंत देशात 4 लाख 66 हजार 584 रुग्णांचा मृत्यू 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 10 हजार 949 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच या व्हायरसमुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 66 हजार 584 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 35 हजार 736 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


राज्यात काल 24 तासांत 766 रुग्णांची नोंद तर 19 जणांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीत स्थिरता दिसून येत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, काल 766 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 929 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.  राज्यात आतापर्यंत एकूण 64,77,379 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण हे 97.68 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही कमी झाली असून त्याचे प्रमाण हे 2.12 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील 85,335 रुग्ण हे होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1077 रुग्ण हे संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 9,493 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे.