श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये (J&K) यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात (Accident) झाला असून या दुर्दैवी घटनेत 20 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. उधमपूरमध्ये झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले असून रामनगरच्या कागोत परिसरात ही बस अनियंत्रित झाल्याने पलटी झाली. या दुर्घटनेत बसमधील (Bus) 20 यात्रेकरु ठार झाले असून 30 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीनी देखील घटनेवर दु:ख व्यक्त केलंय.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेकरुन प्रवाशांची बस रामनगरहून उधमपूरला जात होती, त्याचवेळी जालो क्षेत्राजवळ चालकास बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बसचे टायर फुटल्याने आणि वेगामुळे बस अनियंत्रित होऊन पलटी झाली. मात्र, अपघाताची नेमकी कारणे, आणि सखोल माहिती घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेवर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उधमपूर अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त केला. ''या दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो, अपघातामधील जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. उधमपूर बस दरीत कोसळल्याने अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मृतात्म्यांना शांती मिळावी यासाठी प्रार्थना, शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना, असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले.
