Pahalgam Terror Attack : सिंधू नदी पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय पाकिस्तानवर लगेच परिणाम करणारा ठरणार नाही. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर त्याचे विपरीत परिणाम पाकिस्तानी शेतकरी आणि सामान्य जनतेवर होईल, असे मत संरक्षण तज्ञ कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे.   

अभय पटवर्धन म्हणाले की, पाकिस्तानवर सिंधू नदी करार रद्द करून तातडीने परिणाम आणण्यासाठी आवश्यक मोठे धरण आपल्याकडे नाही. सिंधू नदीवर एकच मोठा धरण आहे. मात्र, त्यामध्ये भारत एका क्षमतेपर्यंतच पाणी थांबवू शकतो. तसंही पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातला गहू आणि मक्याचा यंदाचा पीक आता कापणीवर आला आहे. त्याला पाण्याची फारशी गरज नाही. येणाऱ्या हंगामात होणाऱ्या पेरणीला मात्र सप्टेंबर पासून पाण्याची गरज भासेल आणि तेव्हा भारताने अडवलेलं पाणी पाकिस्तानाला अडचणीचं ठरेल. 

भारताने योजलेले विजा रद्द करण्याचे किंवा वाघा बॉर्डर आणि हुसेनिवाला बॉर्डरवरील ये-जा थांबवण्याचे निर्णय पाकिस्तानवर तातडीने फारसा परिणाम करणारे ठरणार नाही.  फक्त विजा रद्द केल्यामुळे पाकिस्तानी नागरिकांसोबत छुप्या स्वरूपात जे दहशतवादी किंवा त्यांच्या स्लीपर सेलचे व्यक्ती भारतात प्रवेश करायचे, ती गोष्ट विजा रद्द केल्याने नियंत्रणात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.  

योजलेल्या पाच उपायांशिवाय भारताने काय करायला हवं? 

संरक्षण तज्ञांच्या मते भारताने तातडीने पाकिस्तानी विमानांना भारताची एयर स्पेस बंद करावी, तसं केल्यास पाकिस्तानी विमानांना श्रीलंकेला वळसा घालून पूर्वीकडील देशांना जावे लागेल. पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर बीफ पूर्वेकडील देशांना खास करून ईशान्य आशिया, जपान आणि ऑस्ट्रेलियाला निर्यात करतो. भारताने आपली एअर स्पेस बंद केल्याने पाकिस्तानची पूर्वी आशियाई देशांना होणारी निर्यात महागडी होईल आणि त्याचे विपरीत आर्थिक परिणाम पाकिस्तानवर येणाऱ्या काही महिन्यात होतील. 

याशिवाय भारताने बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी ज्या पद्धतीने पाकिस्तानमधील इतर देशातील राजदूतांना बालाकोटमध्ये नेऊन तिथली परिस्थिती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता.  भारताने सुद्धा भारतामधील विविध देशातील राजदूतांना पहलगाममध्ये न्यावं. या माध्यमातून जगातील विविध देशांना पहलगांमधील ग्राऊंड झिरोवर काय घडलं, धर्म विचारून कशी हत्या करण्यात आली ही गोष्ट पोहोचवता येईल आणि पाकिस्तानचा प्रपोगंडा नाहीसा करता येईल, असा सल्ला अभय पटवर्धन यांनी दिला आहे.  

आणखी वाचा 

Atul Mone Family Pahalgam Attack : पहलगामला कोणतीच सुरक्षा नव्हती, दोन-तीन चॉपरनं जाऊन माणसांना वाचवायला हवं होतं; मोने कुटुंबीयांनी सांगितली हादरवणारी कहाणी