चेन्नई : जलिकट्टूच्या समर्थनार्थ तामिळनाडूमध्ये हिंसक आंदोलनाचं सत्र सुरुच आहे. चेन्नईपासून कोईम्बतूरपर्यंत राज्यभरात जलिकट्टूचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांनी पोलिस ठाण्यालाच आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला.


चेन्नईच्या मरिना बीचवर आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला. तामिळनाडू सरकारनं जलिकट्टूसाठी विशेष अध्यादेश काढल्यानंतर मागणी पूर्ण झाली असं सांगत पोलिसांनी आंदोलकांना मरिना बीच सोडण्याची विनंती केली. पण आंदोलकांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली.

त्यानंतंर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार म्हणून आंदोलकांनी मरिना बीचवरील पोलिस ठाण्याला आग लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूत भडकलेला जलिकट्टूचा वणवा अद्यापही पेटताच असल्याचं चित्र आहे.