नवी दिल्ली : पाकिस्तानचे आणखी एक नापाक कृत्य भारताने हाणून पाडलं आहे. भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी आयएसआयने हनिट्रॅप लावला होता. परंतु भारतीय अधिकाऱ्यांच्या चाणाक्षपणामुळे हा डाव उधळून लावण्यात अधिकाऱ्यांना यश आलं आहे.


तीन भारतीय अधिकाऱ्यांची यासंदर्भात चौकशी सुरु असून, काही दिवसांपूर्वी या अधिकाऱ्यांनी आयएसआयच्या या डावाबाबत आपल्या विभागाला माहिती दिली होती. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने बातमी दिली.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितलं की, हे भारतीय अधिकारी पाकिस्तानधील भाषा विभागात कार्यरत होते. भारतातून आलेल्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांचे भाषांतर करण्याचे काम हे अधिकारी करत असत. या अधिकाऱ्यांना गोपनीय ठिकाणी नेऊन त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडियो बनवण्याचा डाव होता. तसेच या व्हिडीओचा वापर करुन अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नात आयएसआय होती.

2010 साली अशा प्रकारचं प्रकरण समोर आले होते. तेव्हा उच्चायुक्तलयातील प्रेस डिव्हिजनमध्ये काम करणाऱ्या माधुरी गुप्ता यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी आयएसआयच्या एका अधिकाऱ्याला गोपनीय कागदपत्रे सोपल्याचे कथित प्रकरण त्यावेळी समोर आले होते.