मुंबई : दुबईमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी प्रवासी व समुदायाला मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली IPF MahaHelpline ही सेवा सुरु करण्यात आली आहे. सध्या इराण–अमेरिका संघर्षामुळे निर्माण झालेल्या प्रवासातील अडचणींमुळे दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी विशेष हेल्पलाईन म्हणून सक्रिय करण्यात आली आहे. ही हेल्पलाईन सुरू झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात 1200 हून अधिक प्रभावित प्रवाशांकडून मदतीच्या विनंत्या प्राप्त झाल्या असल्याची माहिती आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने सुरु असलेली IPF MahaHelpline (+971 50 365 4357) ही सेवा दुबईमधील पाच शहरांमध्ये कार्यरत असलेल्या 20 हून अधिक स्वयंसेवकांच्या पथकाद्वारे 24 तास चालवली जात आहे. अडकलेल्या प्रवाशांना हॉटेल मुक्काम वाढविणे, अन्न व औषधे उपलब्ध करून देणे, तात्पुरती निवासव्यवस्था, वाहतूक सुविधा तसेच दूतावासाशी समन्वय अशा विविध प्रकारची मदत केली जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, अडकलेल्या मराठी प्रवाशांना मदत मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत. याशिवाय, स्थानिक डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक प्रिस्क्रिप्शन मिळवून अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र वैद्यकीय सहाय्य पथकही कार्यरत आहे, ज्यामुळे प्रवाशांचे सुरू असलेले उपचार खंडित होऊ नयेत याची काळजी घेतली जात आहे.
हेल्पलाईनचे पथक दुबईतील भारतीय दूतावासाशीही सातत्याने समन्वय साधत आहे. भारतीय राजदूत आणि कॉन्सुल जनरल यांच्याकडून नियमित माहिती घेतली जात असून, पडताळणी केलेले अद्ययावत अपडेट्स प्रभावित प्रवाशांपर्यंत व्यावसायिक पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या व्हॉट्सअॅप समन्वय गटामार्फत पोहोचवले जात आहेत. 2 ते 6 मार्च या कालावधीत दुबईतील विविध विमानतळांवरून तसेच ओमानमधील मस्कत येथून उपलब्ध उड्डाणांद्वारे 500 हून अधिक प्रवासी सुखरूप भारतात परतले आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दुबई येथील भारतीय कॉन्सुल जनरल तसेच IPF MahaHelpline च्या व्यवस्थापन पथकाशी सातत्याने संपर्कात असून, या प्रदेशात अडकलेल्या प्रवाशांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या माध्यमातून फुजैराह आणि मस्कतसारख्या पर्यायी प्रस्थान केंद्रांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच सहाय्य पथक लहान मुले, अर्भके आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या कुटुंबांना विशेष मदत पुरवत आहे.
हवाई क्षेत्रातील अडथळ्यांमुळे IndiGo, SpiceJet आणि Air India या भारतीय विमान कंपन्यांची अनेक उड्डाणे रद्द झाल्यानंतर, या पथकाने 400 हून अधिक प्रभावित प्रवाशांची यादी तयार केली आहे.त्यानंतर ही यादी कॉन्सुलेटमार्फत संबंधित विमान कंपन्यांना पाठविण्यात आली असून, उपलब्ध आसने आणि उड्डाणांच्या स्लॉटमध्ये या प्रवाशांना प्राधान्य देऊन त्यांचे लवकरात लवकर भारतात पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उड्डाणांची संख्या हळूहळू वाढत असल्याने, पुढील काही दिवसांत जास्तीत जास्त प्रवाशांना मायदेशी परत पाठवण्यासाठी हेल्पलाईनचे पथक महाराष्ट्र शासन, दुबईतील भारतीय कॉन्सुल जनरल कार्यालय, विमान कंपन्या आणि चार्टर ऑपरेटर्स यांच्यासोबत जवळून काम करत आहे.