Indore Honeymoon Couple: इंदूरचे सोनम आणि राजा रंघुवशी हे कपल लग्नानंतर नुकतेच फिरण्यासाठी गेले होते. इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी हत्याकांडात प्रमुख आरोपी असलेली त्यांची पत्नी सोनमने हा सर्व कट रचल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येताना दिसत आहेत, सेल्फी काढत असताना पतीला उंच ठिकाणावरून खाली ढकलून देण्याता प्लॅन देखील सोनमने केल्याचं समोर आलंय. अशातच राजाचे वडील अशोक रघुवंशी यांनी या घटनेबाबत केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे, सोनमने आपल्या कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी आणि प्रियकर राज कुशवाह याच्यासोबत विवाह करता यावा म्हणून पतीची हत्या केली, असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हनीमूनसाठी मेघालयात गेल्यानंतर राजा रघुवंशी (वय 29) याची हत्या झाली होती. सुपारी देऊन मारेकऱ्यांकरवी पत्नी सोनमनेच (25 वर्षे) आपल्या पतीचा काटा काढल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं असून, या दृष्टीने मेघालय पोलिस मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने तपास सुरू आहे. ज्या दिवशी सोनमने व्रत ठेवले होते, त्याच दिवशी तिने तिच्या डोळ्यासमोर तिच्या पतीला संपविल्याचंही समोर आलं आहे. त्यांनी केलेल्या प्लॅाननुसार, राजा रघुवंशीला धबधब्याच्या जवळ मारायचे होते. या दरम्यान, सुपारी किलरखूप साऱ्या पायऱ्या चढून थकला होता, म्हणून त्याने राजा रघुवंशीला मारण्यास नकार दिला होता. तेव्हा सोनम त्याला ओरडून म्हणाली की, त्याला मारावे लागेल. मी तुला 20 लाख रुपये देईन.
सोनमने इशारा केला तिच्या डोळ्यादेखत राजा...
पोलिसांच्या माहितीनुसार, सोनम व राजा रघुवंशी हनीमूनसाठी शिलाँगला पोहोचल्यानंतर मारेकऱ्यांनी नियोजनानुसार सोनमच्या समोरच पती राजा याची हत्या केली. मारेकऱ्यांना गुवाहाटीत बोलावून एक धारदार शस्त्र खरेदी करण्यात आले. शिलाँगमध्ये चौहान, राजपूत आणि कुर्मी हे तिघे सोनम-राजा यांच्यासोबत चालत राहिले. सोनमने इशारा केला आणि तिघांनी सोनमसमोर राजाच्या डोक्यात वार केले. सोनमने आरोपींसाठी तिकिटे बुक केली होती. काम झाले पाहिजे, असे तीने त्या आरोपींना देखील सांगितलं होतं.
'सेल्फी प्लॅन' पासून ते हत्येपर्यंत
तपासातून असे दिसून आले आहे, की सोनमची पहिली योजना राजाला एका उंच ठिकाणी घेऊन जाण्याची आणि 'सेल्फी'च्या बहाण्याने त्याला ढकलून देण्याची होती, जेणेकरून त्याचा मृत्यू अपघात म्हणून दाखवता येईल. परंतु काही कारणास्तव ही योजना यशस्वी होऊ शकली नाही. त्यानंतरच सोनमने राजसह तिच्या तीन मित्रांवर हत्येची जबाबदारी सोपवली. हेच कारण आहे की ही हत्या नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली.
हवाला कनेक्शन
तपासात असे दिसून आले आहे की, राजच्या फोनवरून अनेक हवाला व्यवहारांचे संकेत मिळाले आहेत. हवाला व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नोटांचे फोटोही फोनमध्ये सापडले आहेत. सर्वात मोठा खुलासा म्हणजे सोनम रघुवंशीचे बँक खाते हवाला व्यवहारात वापरले गेले. राजाची हत्या आवेगाने झाली नव्हती, तर नियोजनानुसार झाली होती. राजने पिथमपूरमधील एका हवाला व्यापाऱ्याकडून 50000 रुपये उधार घेतले होते, जे त्याने हत्येपूर्वी त्याच्या तीन मित्रांमध्ये वाटले होते. ही रक्कम कदाचित हत्येच्या तयारीसाठी वापरली गेली असावी, अशी शक्यता आहे.
लग्न आणि कट
हत्येची कहाणी सोनम आणि राजच्या लग्नापासून सुरू झाली. लग्नाच्या दिवशी राज खूप रडला, जे पाहून त्याच्या मित्रांनी राजा रघुवंशीला मारण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दिवशीच राजने सोनमला सांगितले होते, "राजाला शिलाँगला घेऊन जा, तिथे तो त्याला मारेल." नंतर सोनम राजाला म्हणाली, “जोपर्यंत कामाख्या देवीला जाऊन येत नाही तोपर्यंत आपण एकत्र येऊ शकत नाही.” या बहाण्याने राजाला शिलाँगला नेण्यात आले.
हत्येनंतर नेपाळला पळून जाण्याची तयारी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर सोनम नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होती. हत्येनंतर ती सिलीगुडीमार्गे इंदूरला आली आणि नंतर उत्तर प्रदेशला पोहोचली.
ऑपरेशन 'हनीमून'
या संपूर्ण प्रकरणाचे थर उलगडण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन 'हनीमून' सुरू केले, ज्यामध्ये 120 हून अधिक पोलिसांचा सहभाग होता. 42 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासण्यात आले. त्यानंतरच संपूर्ण कटाचे दुवे जोडता आले. राजा रघुवंशी हे इंदूरमधील एका वाहतूक व्यावसायिकाच्या कुटुंबातील होते. सोनमचे कुटुंब इंदूरमधील कुशवाह नगर येथे राहते, जिथे तिच्या वडिलांचा प्लायवुडचा व्यवसाय आहे. राजा आणि सोनमचे नाते रघुवंशी समाजाच्या ओळखपत्रात नोंदवलेल्या विवाह नोंदणीमुळे जोडले गेले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी संपर्क साधला आणि लग्नाचं ठरलं. राजाचे कुटुंब सोनमच्या घरी गेले आणि तिला पसंत केले. त्यानंतर लग्न निश्चित झाले. राजाची आई उमा रघुवंशी म्हणते की आम्ही आमच्या सुनेला खूप प्रेमाने स्वीकारले होते. आम्ही तिच्या आईशी बोलत होतो, तेव्हा सर्व काही ठीक वाटत होते.