IndiGo Airlines : गेल्या काही दिवसांत इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कंपनीने काल मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली होती. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. या विरोधात प्रवाशांनी संताप देखील व्यक्त केला होता. काल केवळ 700 हून अधिक उड्डाणे 113 ठिकाणी चालवण्यात आली होती. दरम्यान,  आजपासून पुन्हा मोठ्या प्रमाणावर उड्डाणे सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. आज अखेरीस 1500 पेक्षा अधिक उड्डाणे सुरु होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

सध्या इंडिगोची 95 टक्क्यांहून अधिक नेटवर्क कनेक्टिव्हिटी पुन्हा पूर्ववत झाली

नेटवर्क, प्रणाली आणि कर्मचारी वेळापत्रक पुन्हा सुरळीत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे इंडिगोने स्पष्ट केले आहे. आजपासून पुन्हा मोठ्या प्रमाणावर उड्डाणे सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न असून, आज अखेरीस 1500 पेक्षा अधिक उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या इंडिगोची 95 टक्क्यांहून अधिक नेटवर्क कनेक्टिव्हिटी पुन्हा पूर्ववत झाली आहे.  138 पैकी 135 ठिकाणी उड्डाण सेवा सुरु झाली आहे. मात्र, अजूनही पूर्णपणे सुरळीत स्थितीला वेळ लागणार असल्याचे कंपनीने मान्य केले आहे.

इंडिगो एअरलाईन्सच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळं इतर विमान कंपन्यांच्या तिकीट दरात वाढ

इंडिगो एअरलाईन्सच्या (Indigo Airlines) बिघडलेल्या वेळापत्रकाचा देशातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम होत असून, इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात (Ticket Price) मोठी वाढ केली आहे. अनेक लोकप्रिय मार्गावरील भाडे प्रचंड वाढले असून, एअर इंडियाच्या पुणे–मुंबई उड्डाणाचे तिकीट दर तब्बल एक लाख रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच नागपूर–मुंबई मार्गावरील विमानासाठी देखील 30 हजार रुपयांहून अधिक भाडे आकारले जात असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून पुणे विमानतळावर त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. शुक्रवारी इंडिगोची 46 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू, रांची तसेच महाराष्ट्रातील 23 उड्डाणांचा समावेश आहे. बाहेरील राज्यांतून पुण्यात येणारी 23 उड्डाणे देखील रद्द करण्यात आली होती. काही उड्डाणांचे वेळापत्रक दिवसभरात अनेकदा बदलण्यात आले, त्यामुळे प्रवासी पूर्णपणे गोंधळून गेल्याचे पाहायला मिळाले. इंडिगोने शुक्रवारी देशभरातील जवळपास 500 उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर सलग चौथ्या दिवशी देशातील विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी उड्डाण करणारी सर्व देशांतर्गत विमाने मध्यरात्रीपर्यंत (11:59 वाजेपर्यंत) रद्द केल्याचे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने 'एक्स'वर जाहीर केले. यामुळे हजारो प्रवासी ताटकळले, काहींना रात्रभर विमानतळावरच थांबावे लागले.

Continues below advertisement