Sushma Andhare : पहलगाममध्ये झालेला हल्ला हा आमच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला होता. या हल्ल्याला आम्ही उत्तर देत असताना भारताने काय करावं याचे निर्देश देणारी अमेरिका पुन्हा एकदा आमच्या सार्वभौमत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं आहे. युद्ध सुरू होण्याच्या आधी किंवा नंतर एकाही सर्वपक्षीय बैठकीला हजर न राहणारे पंतप्रधान मोदी हे भारताला सांगायला का घाबरत आहेत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या संदर्भात काहीही ठरवण्याचा अधिकार हा ट्रम्पला कोणी दिला? असा सवाल अंधारे यांनी केला आहे.
गेल्या दहा वर्षात मोदींनी वेगवेगळ्या देशात जे आंतरराष्ट्रीय पर्यटन केले. त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृतीनुसार पेहराव करत त्या त्या राष्ट्र प्रमुखांसोबत चे फोटो व्हिडिओ बातम्या गोदी मीडियात चालवल्या. यापैकी एकही देश अत्यंत खुलेपणाने या कठीण प्रसंगांमध्ये भारतासोबत ठामपणे का उभा राहिला नाही? मग गेल्या दहा वर्षातलं आमचं परराष्ट्र धोरण फसलेलं आहे का? विविध देशांशी आंतरराष्ट्रीय संबंध विकसित करत असताना भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी आम्ही इतर देशांची सहमती मिळवण्यामध्ये अपयशी ठरलो आहोत का? हे मोदींनी पत्रकार परिषदेमध्ये येऊन निधड्या छातीने सांगण्याची गरज आहे असे अंधारे म्हणाल्या.
जर मोदींच्या एका फोनवर यूक्रेन्स युद्ध थांबू शकत तर भारत पाकिस्तान मध्ये जो काही सामरिक तणाव सुरू झाला या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मध्यस्थी करणे हे कितपत योग्य आहे? भारतीय उपखंडातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या संदर्भात काहीही ठरवण्याचा अधिकार हा ट्रम्पला कोणी दिला? असा सवाल अंधारे यांनी केला आहे.
इंदिरा गांधींनी कधीही राष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये अमेरिका किंवा रशियाचा हस्तक्षेप मान्य केला नाही
जे मोदी भक्त सत्तर वर्षात गांधींनी काय केले किंवा नेहरूंनी काय केले असे प्रश्न विचारतात. त्यांना किमान यानिमित्ताने एक उत्तर नक्की मिळाले असेल की देशाच्या प्रमुख म्हणून इंदिरा गांधींनी या पद्धतीने कधीही भारतासारख्या सार्वभौम राष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये अमेरिका किंवा रशियाचा हस्तक्षेप मान्य केला नाही. मोदींनी स्पष्टीकरण द्यायला हवे असे अंधारे म्हणाल्या. ट्रम्फ मेरे आंगने में तुम्हारा क्या काम है असे म्हणत अंधारे यांनी टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या:
