Iran Isreal Conflict : रमजानच्या पवित्र महिन्यात इराण-इस्त्रायल युद्ध भडकणं दुर्दैवी, भारताकडून भूमिका स्पष्ट, एक कोटी भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
India On Iran Isreal War : इराण-खाडी संघर्ष तीव्र होत असताना आखातातील एक कोटी भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

Iran Isreal War Update : इराण आणि आखाती भागातील संघर्ष तीव्र होत असताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात आखाती भागातील संघर्ष वाढणे हे दुर्दैवी असल्याचं भारताने स्पष्ट केलं. या संघर्षात अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि त्याबद्दल भारताने तीव्र शोक व्यक्त केला. भारत सरकार बदलत्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून राष्ट्रीय हित लक्षात घेऊन आवश्यक निर्णय घेत राहील, असेही स्पष्ट करण्यात आलं आहे.
Indian Citizens Safety : एक कोटी भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न
आखाती भागात सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास असून तेथे काम करतात. त्यांच्या सुरक्षेला आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. या प्रदेशातील कोणत्याही नकारात्मक घडामोडींचा परिणाम भारतावर होऊ शकतो, याचीही चिंता सरकारने व्यक्त केली.
संघर्षग्रस्त देशांतील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास नागरिकांशी सातत्याने संपर्कात असून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक सूचना (Advisories) जारी करत आहेत. अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे मंत्रालयाने सांगितलं.
Energy Supply Impact : व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम
भारताची व्यापार आणि ऊर्जा पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणात याच भौगोलिक क्षेत्रातून जाते. त्यामुळे कोणताही मोठा व्यत्यय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गंभीर परिणाम घडवू शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
व्यावसायिक जहाजांवरील (Merchant Shipping) हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला आहे. गेल्या काही दिवसांत अशा हल्ल्यांमध्ये काही भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Diplomatic Appeal : संयम आणि संवादाचे आवाहन
28 फेब्रुवारी रोजी इराण आणि इस्त्रायल-अमेरिका संघर्ष सुरू झाल्यानंतर भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे, तणाव वाढवू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असं आवाहन केलं होतं. मात्र रमजानच्या पवित्र महिन्यात परिस्थिती अधिकच बिघडल्याचे मंत्रालयाने नमूद केलं.
भारताने पुन्हा एकदा संवाद आणि कूटनीतीचा मार्ग स्वीकारण्यावर भर दिला आहे. लढाई लवकरात लवकर थांबावी, अशी स्पष्ट भूमिका भारताने मांडली आहे.
Prime Minister & External Affairs : उच्चस्तरीय चर्चा सुरू
पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या समकक्ष नेत्यांशी चर्चा केली असून भारत या क्षेत्रातील सरकारांशी आणि प्रमुख भागीदार देशांशी सतत संपर्कात आहे. बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून देशहितासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.
ही बातमी वाचा:
























