Amit Shah : ग्रामविकासाला गती देऊन, देशाच्या अर्थव्यवस्थेत ग्रामविकासाचं योगदान मिळवल्याशिवाय भारत कदापी स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होणार नसल्याचे वक्तव्य देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलं. ग्रामविकास साधून गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समृद्धीकडे नेल्याशिवाय भारत आत्मनिर्भर होणार नसल्याचे ते म्हणाले. गुजरातमधील ग्रामीण व्यवस्थापन संस्था, आणंद' (IRMA) च्या 41 व्या वार्षिक दीक्षान्त समारंभात शाह सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. तरुणांनी खेड्याकडे जावं असं आवाहन देखील अमित शाह यांनी यावेळी केलं.


भारताचा आत्मा खेड्यात


भारताचा आत्मा खेड्यात राहतो. म्हणून जर भारताला समृद्ध, स्वस्थ व स्वयंपूर्ण करायचे असेल तर आधी खेड्यांना समृद्ध, स्वस्थ व स्वयंपूर्ण केले पाहिजे, असे महात्मा गांधीजी म्हणत. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमके याच दिशेने प्रयत्न सुरु केले. मोदी पंतप्रधान झाल्यापासून ते काम प्रत्यक्षात होऊ लागल्याचे शाह म्हणाले. मोदीजींनी देशाला आणि जगाला ग्रामविकासाची एक नवी दृष्टी दिली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या आठ वर्षांत व्यक्तीच्या, गावाच्या आणि प्रदेशाच्या विकासासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. पूर्वी 60 कोटी लोकांचे बँकेत खातेही नव्हते आणि ते अर्थव्यवस्थेशी जोडलेही गेले नव्हते. आज मात्र गेल्या आठ वर्षांत केलेल्या प्रयत्नांमुळे बँकेत खाते नसलेले असे एकही कुटुंब नसेल असे शाह यांनी सांगितलं. पूर्वांचलच्या अनेक कुटुंबांना स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही वीजदेखील मिळालेली नव्हती. प्रत्येक घराला वीजपुरवठा करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी सुरु केल्याचे शाह म्हणाले.




जनतेचे  स्वास्थ्यपूर्ण जीवनमान उंचावण्यासाठी सरकारचे प्रयत्न


प्रत्येक घरात शौचालय असण्याची किमान गरजही पूर्वी भागत नसे. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरु केले आणि आज प्रत्येक घरात शौचालय आहे. प्रत्येक घरी फ्ल्युओराइडविरहित शुद्ध पाणी नळाने पोहोचवण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मोदीप्रणीत सरकारने प्रत्येक गरीब घराला स्वयंपाकाचा गॅसही उपलब्ध करुन दिला आहे. याबरोबरच, केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 60 कोटी गरिबांना आरोग्यकार्ड देऊन 5 लाखांपर्यंच्या आरोग्यसुविधा पुरवल्या आहेत. जीवन स्वास्थ्यपूर्ण करण्यासाठी आणि जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदीप्रणीत सरकरने अनेक प्रयत्न केल्याचे शाह म्हणाले. 




पंतप्रधानांचे खादी ग्रामोद्योगाला प्राधान्य
 
गांधीजींनंतर खादीचा विसरच पडला होता, परंतु आता पंतप्रधानांनी प्राधान्य दिल्यामुळं खादी ग्रामोद्योगाची उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. शेतीला स्वयंपूर्ण केल्याखेरीज गावांचा संपूर्ण विकास शक्य नाही. हे लक्षात घेऊन त्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांना कर्जे घ्यावी लागणार नाहीत, याचीही काळजी मोदीजींनी घेतली आहे. 75 टक्के शेतकऱ्यांकडे दोन एकरांपेक्षाही कमी जमीन आहे आणि दोन एकर जमीन कसण्याचा पिकवण्याचा किमान खर्च सहा ते सात हजाराच्या घरात जातो. हे लक्षात घेऊन मोदीजींनी एक व्यवस्था बसवली. त्याद्वारे प्रत्येक शेतकऱ्यास दरवर्षी 6,000 रुपये वितरित केले जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागणार नाही. असेही शाह म्हणाले. शेती स्वयंपूर्ण करण्यासाठी, शेतकरी उत्पादन वाढवतील, परंतु विपणनासाठी सहकारी संस्था हा सर्वात सोपा मार्ग आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच, पंतप्रधान मोदीजींनी सहकार मंत्रालय स्थापन केले. देशाच्या ग्रामविकासात हे मंत्रालय महत्त्वाची भूमिका निभावेल आणि वेगाने ग्रामीण विकास घडून येईल असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.




डॉ. वर्गीस कुरियन यांच्या आठवणींना उजाळा


डॉ. वर्गीस कुरियन यांच्या आठवणींना अमित शाह यांनी उजाळा दिला. कुरियन यांनी ग्रामस्थांच्या शाश्वत, परिस्थितीला अनुकूल, समानशील, अशा सामाजिक-आर्थिक विकासाची संकल्पना मनात धरुन ही संस्था स्थापन केली. तुम्हाला आयुष्यात जेव्हा जेव्हा काही मिळेल, तेव्हा तेव्हा त्याची परतफेड करण्याचेही उद्दिष्ट मनात बाळगा असा सल्लाही शाह यांनी विद्यार्थ्यांना दिला.