चेन्नई : सप्टेंबर महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी रविवारी पहिल्यांदाच संवाद साधला आहे. तुमच्या प्रार्थना आणि पूजा यामुळेच आपल्याला पुनर्जन्म मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


तामिळनाडू, इतर राज्य आणि जगभरातील नागरिकांनी सातत्याने केलेल्या प्रार्थना, पूजा-पाठ यामुळे मला नवजीवन मिळालं. ही बातमी तुम्हाला सांगताना प्रचंड आनंद होत आहे, असं त्यांच्या पक्षानं प्रकाशित केलेल्या निवेदनात जयललिता म्हणाल्या.

जनतेचं प्रेम मिळाल्यामुळे आपण प्रचंड आनंदी आहोत, प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच कामाला सुरुवात करेन, अशी ग्वाही जयललितांनी दिली.

येत्या निवडणुकांमध्ये अण्णाद्रमुकला मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं. तिन्ही मतदारसंघांमध्ये पक्षाने विजयाचा गुलाल उधळल्याचं वृत्त मला ऐकायचं आहे, असंही त्या म्हणाल्या.