नवी दिल्ली: उत्तर भारतात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हिमाचल प्रदेशातील चंबामधील रावी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे मोठं नुकसान झालंय तर नदीशेजारील गावांचा संपर्क तुटला आहे.


तिकडे मनालीसारख्या थंड हवेच्या ठिकाणीही पावसामुळे मोठी हानी झाली.

उत्तराखंडच्या उत्तरेकडील अलकनंदा नदीची पाणीपातळी अचानक वाढल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे अडकलेल्या कामगारांना वाचवण्यात आलं.



जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पावसानं पूरस्थिती निर्माण झाली. झेलम नदीची पाणीपातळी वाढत असल्यामुळे नदीनजीकच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तिकडे राजस्थानमधील बिकानेरमध्ये पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय तर अनेक रस्ते पाण्य़ाखाली गेले आहेत. रस्त्यांवर अनेक प्राणी मृतावस्थेत आढळत आहेत. एके ठिकाणी तर माय-लेकींचा मृत्यू झाला. तर, झालावाड शहरातल्या बकानी लसूण केंद्रात पावसानं मोठं नुकसान झालं.