हाथरस: उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले आहेत. याबाबत पीडितेच्या परिवारानं आरोप केले आहेत, तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर आरोप केले आहेत. हाथरसमधील अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.


'भारत की बेटी' वर अत्याचार करुन हत्या केली जाते. सत्य लपवलं जातंय आणि शेवटी तिच्या परिवाराचा अंत्यसंस्कार करण्याचा हक्क देखील हिरावला जातोय, असं ट्वीट राहुल गांधींनी एक व्हिडीओ शेअर करत केलंय. युपीतील वर्ग-विशेष जंगलराजने आणखी एका तरुणीची हत्या केली. ही फेक न्यूज आहे असं सांगत सरकारने पीडितेला मरण्यासाठी सोडून दिलं. दुर्दैवाने ही घटना फेक न्यूज नव्हती, ना पीडितेचा मृत्यू आणि ना सरकारची क्रूरता, असं ट्विट करत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.





आमची दिशाभूल केली जातेय- पीडितेचा भाऊ


सफदरजंगमध्ये धरणे आंदोलन करणाऱ्या पीडितेच्या परिवाराला काल पोलिसांनी तिथून हटवलं. परिवाराकडून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत हॉस्पिटलसमोर आंदोलन सुरु केलं होतं. पीडितेच्या भावाचं म्हणणं आहे की, आमची दिशाभूल केली जात आहे. आम्हाला न्याय हवा आहे. हॉस्पिटलबाहेर काँग्रेस, भीम आर्मी आणि अन्य संघटनांनी देखील आंदोलनं केली. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणी न्याय व्हावा, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, असं त्यांनी म्हटलं आहे.


रेप झाला की नाही हे अद्याप स्पष्ट नाही- आयजी
या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात केस दाखल करण्याबाबत आयजी पीयूष मोर्डिया यांचं म्हणणं आहे की, पीडितेच्या जबाबानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र रेप झाला की नाही हे अद्याप स्पष्ट नाही, कारण जे एन मेडिकल कॉलेजच्या रिपोर्टमध्ये तसं म्हटलं आहे. सॅम्पल 26 सप्टेंबर रोजी फॉरेंसिक सायंस लॅबोरेटरीकडे पाठवले आहेत. त्याचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत. ते रिपोर्ट आल्यावर याबाबत स्पष्टपणे माहिती येईल असं, मोर्डिया यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात चार आरोपिंना पकडण्यात आलं आहे.


19 वर्षाच्या मुलीसोबत रेप आणि हत्या
माहितीनुसार यूपीच्या हाथरस जिल्हातील एका गावात 14 सप्टेंबर रोजी 19 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. घटनेनंतर पीडितेला अलीगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. सोमवारी तिची प्रकृती गंभीर असल्यानं तिला उपचारासाठी दिल्लीला आणलं. मात्र मंगळवारी उपचारादरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला. यूपी सरकारने पीडितेच्या कुटूंबासाठी 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.