नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मुगलसराय या रेल्वे स्टेशनला जनसंघाचे संस्थापक पं. दीनदयाल उपाध्याय यांचं नाव देण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारने केंद्राला दिला आहे. केंद्र सरकार यावर विचार करत असल्याची माहिती आहे.


उत्तर प्रदेश सरकारने मुगलसराय स्टेशनचं नाव बदलण्याचा प्रस्ताव दिला असून केंद्र सरकार यावर विचार करत आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने याबाबत मागील महिन्यात निर्णय घेतला होता. मात्र रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे.

11 फेब्रुवारी 1968 रोजी रेल्वे प्रवासादरम्यान पं. दीनदयाल उपाध्याय मुगलसराय रेल्वे स्टेशनवर संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळून आले होते.

रेल्वे मार्गाने पूर्व भारताला पूर्वोत्तर राज्यांशी जोडणारं मुगलसराय हे सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन आहे. तसंच हे देशातील सर्वात व्यस्त असणारं चौथं रेल्वे जंक्शन म्हणूनही ओळखलं जातं.