नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानला प्रत्यक्षदर्शींनी तोंडघशी पाडलं आहे. 29 सप्टेंबरच्या पहाटे भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात खात्मा केलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रकमधून अज्ञातस्थळी नेऊन दफन केले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.


'इंडियन एक्स्प्रेस'ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केल आहे. भारतालगतच्या एलओसीजवळ राहणाऱ्या 5 प्रत्यक्षदर्शींशी संपर्क साधून ही माहिती समोर आणल्याचा दावा इंडियन एक्स्प्रेसने केला आहे.

सर्जिकल स्ट्राईक निव्वळ बनाव, संजय निरुपम यांचा सनसनाटी आरोप


स्थानिकांच्या माहितीवर प्रत्यक्षदर्शींचा दावा

प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार, "29 सप्टेंबरच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्य आणि अतिरेक्यांमध्ये तुंबळ धुमश्चक्री झाली होती. इतकंच नाही तर पहाटेच्या सुमारास सर्जिकल स्ट्राईक संपल्यानंतर, दहशतवाद्यांचे मृतदेह काही ट्रकमध्ये भरुन अज्ञातस्थळी दफन करण्यासाठी नेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली."

सर्जिकल स्ट्राईक अगदी जवळून अनुभवल्याचं प्रत्यक्षदर्शींपैकी दोघांनी सांगितलं. ते दोघे दुदनैलमध्ये होते. ही जागा एलओसीपासून 4 किमी  आत (पाकव्याप्त काश्मीरच्या बाजूने) आहे. तिथे अल-हवाई नावाचा एक पूल आहे. त्याच्याजवळ अलेली इमारत उद्ध्वस्त केली. याच ठिकाणाहून दहशतवादी सामान घेऊन भारतात दाखल होण्यासाठी येतात. सकाळी काही मृतदेह ट्रकमधून भरुन नेले.

सैन्याचा अपमान करु नका, भाजपचा केजरीवालांवर हल्लाबोल


उरीचा बदला, भारताचं सर्जिकल स्ट्राईक

उरीमध्ये भारतीय जवानांच्या कॅम्पवरील हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. एलओसी पार करुन भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांना खात्मा झाला.

पाकिस्तानसह संशयी नेत्यांचे दात घशात

प्रत्यक्षदर्शींच्या या दाव्यामुळे सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेणाऱ्या पाकिस्तानसह भारतातील काही नेत्यांचे दात घशात गेले आहेत. भारताने सर्जिकल स्ट्राईक केलाच नाही, असा दावा पाकिस्तान करत आहे.

...म्हणून अमावस्येच्या आदल्या रात्री 'सर्जिकल स्ट्राईक'!


शिवाय काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकवरच प्रश्न उपस्थित केले होते. सर्जिकल स्ट्राईकबद्दल जोपर्यंत पुरावे मिळत नाही, तोवर संशय कायम राहील. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पुरावे द्यावेत, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. इतकंच नाही तर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा, मात्र तो खोटा आणि राजकीय फायद्यासाठी नको, असं ट्वीटही निरुपम यांनी केलं होतं.

सर्जिकल स्ट्राईक: डोग्रा आणि बिहार रेजिमेंटने बदला घेतला


सर्जिकल स्ट्राईकबाबत पाकिस्तान खोटा दावा करत असून गैरसमज पसरवत आहे. पाकिस्तानच्या या खोट्या प्रचाराचा सरकारने पर्दाफाश करावा, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते.