नवी दिल्ली: शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी बंदी आणल्याप्रकरणी, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेत लक्षवेधी मांडली.


गायकवाडांवर आणलेली बंदी ही चुकीची असल्याचं मत अडसूळांनी मांडलं. तसंच हा संचार स्वातंत्र्यावर घाला असल्याचंही आडसूळ म्हणाले.

"एअर इंडियाने खासदारांवर गुन्हा दाखल केला. पण सर्वच विमान कंपन्यांनी बंदी घालणे चुकीचे आहे. संविधानानुसार कुठेही प्रवास करता येतो. बंदी घालणे हे आपल्या हक्कापासून वंचित करणे आहे. माझी अपेक्षा आहे की, सर्व खासदार सहकार्य करतील.

अध्यक्षांनी सरकारला निर्देश द्यावे, कपिल शर्मा यांनी मारहाण केली परंतु त्यावर चौकशी सुरु आहे. नागरी उड्डाणमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. विमान कंपन्यांनी बंदी उठवावी", असं अडसूळ म्हणाले.

खासदार अडसूळ यांनी मांडलेल्या लक्षवेधीला केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपतीराजू यांनी उत्तर दिलं.

अशाप्रकारची बंदी घालण्याचा निर्णय हा आश्चर्यकारक असून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचं अशोक गजपतीराजू यांनी म्हटलं.

अशोक गजपती राजू यांचे उत्तर

"कोणत्याही प्रवाशाला बंदी घालता येत नाही. खासदार हे सुद्धा प्रवासी आहेत. खासदार म्हणून भेदभाव करु शकत नाही सुरक्षेबाबत तडजोड करता येणार नाही", असं नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू म्हणाले.

रवींद्र गायकवाड काळ्या यादीत

पुण्याहून दिल्ली प्रवास करताना इकॉनॉमिक आणि बिझनेस क्लासच्या सीटवरुन खासदार गायकवाड आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यात वाद झाला होता.  यानंतर रवींद्र गायकवाडांनी त्या कर्मचाऱ्याला चप्पलेनं मारहाण केली. यानंतर सर्व विमान कंपन्यांनी मिळून रवींद्र गायकवाड यांना विमान प्रवाशांच्या यादीतून काळ्या यादीत टाकलंय.

संबंधित बातम्या

खा. रवींद्र गायकवाड यांचं लेखी स्पष्टीकरण


प्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बाजूने

मीडियाशी बोलू नका, उद्धव ठाकरेंकडून खा. गायकवाड यांना समज

खा. रवींद्र गायकवाड अधिवेशनाला हजेरी लावणार?