भाजप दिलेलं आश्वासन पूर्ण करणार? शेतकऱ्यांना मिळणार 9000 रुपये, नेमका काय आहे निर्णय?
Delhi Assembly Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) भाजपला (BJP) मोठं यश मिळालं आहे. या विजयाची फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

Delhi Assembly Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) भाजपला (BJP) मोठं यश मिळालं आहे. आम आदमी पार्टीचा (AAP) या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे. दरम्यान, भाजपच्या या विजयचा मोठा फायदा दिल्लीतील शेतकऱ्यांना (Farmers) होणार आहे. कारण पंतप्रधान किसान सन्मान निधीशी (PM Kisan Samman Nidhi) संबंधित शेतकऱ्यांना आता प्रत्येकी तीन महिन्याला 2000 रुपयांऐवजी 3000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे संपूर्ण वर्षात शेतकऱ्यांना 9000 रुपये मिळणार आहेत.
देशाची राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. तब्बल 27 वर्षांनंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन होत आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर राजधानी दिल्लीतील जनता भाजपने आपल्या निवडणूक भाषणात आणि जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांवर लक्ष ठेवणार आहे. विशेषत: शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासने सरकार पूर्ण करणार का? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
भाजपनं काय दिलं होतं आश्वासन?
दिल्लीत भाजपचे सरकार आल्यास पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांऐवजी 9000 रुपये दिले जातील, असे आश्वासन भाजपने दिले होते. दर चार महिन्यांनी, देशातील शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळतात, तिथे दिल्लीतील शेतकऱ्यांना 3,000 रुपये मिळतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने अनेक घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांपैकी एक घोषणा दिल्लीतील शेतकऱ्यांसाठीही होती. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की, पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणी केलेल्या दिल्लीतील कोणत्याही शेतकऱ्याला भाजप सरकार एका वर्षात 9,000 रुपये देईल.
किती शेतकऱ्यांना फायदा होणार?
देशाची राजधानी दिल्लीतील खेड्यापाड्यात सुमारे 40 हजार शेतकरी राहतात. अहवालानुसार, दिल्लीतील पीएम किसान सन्मान निधीमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या एकूण एक चतुर्थांश आहे. जर आपण आकड्यांवर नजर टाकली तर दिल्लीत पीएम किसानशी संबंधित शेतकऱ्यांची संख्या सध्या 10800 च्या आसपास आहे.
9.75 कोटी वार्षिक बजेट
पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला 9000 रुपये मिळाले तर दिल्ली सरकारला या योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचे बजेट वेगळे ठेवावे लागेल. आकडेवारीनुसार, दरवर्षी 10,800 हून अधिक शेतकऱ्यांना 9,000 रुपये देणे म्हणजे त्यासाठीचे बजेट 9.75 कोटी रुपये लागणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारीला जमा होणार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावर आहेत. तिथे पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता वितरीत केला जाणार आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. पीएम किसान अंतर्गत देशातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले जाऊ शकतात, ज्यांची रक्कम 3.50 लाख कोटी रुपये आहे.























