नवी दिल्ली : जगभरात कोविड लशीचे 301 कोटींपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत. सर्व व्यवहार कधीपर्यंत सुरळीत होतील याचं अमेरिकेपुरतं उत्तर अँथनी फाऊची यांच्या सारख्या तज्ञांनी दिलं आहे, त्यांच्यामते जोवर 70 ते 85 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण होत नाही तोवर परिस्थिती निवळणार नाही. 


अमेरिकेत आत्तापर्यंत साडे 32 कोटी डोस दिले गेले आहेत (त्यातील साधारण 16 कोटी लोकांना दोन्ही डोस दिले गेले आहेत). सध्या दररोज सरासरी 10 लाख लोकांना लस दिली जाते याच गतीने 75 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी किमान पाच महिने लागतील तर युरोपला दोन महिने लागतील असं ब्लुमबर्गच्या एका अहवालात म्हंटलं आहे.  भारतात सध्या 34 कोटी 76 हजार 232 डोस दिले गेले आहेत. सध्या दररोज साधारण 40 लाख लोकांना लस दिली जाते, या गतीने भारतातील 75 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्ष लागेल असा अंदाज आहे.


भारतात जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाने  34 कोटींचा टप्पा पार केला आहे.  आज सकाळी 7 वाजेपर्यंत  एकूण 34 कोटी 76 हजार 232  मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 42 लाख लसी  देण्यात आल्या आहे. लसीकरण अभियानाच्या 167 व्या दिवशी  देण्यात आलेल्या  42 लाख 64 हजार 123 मात्रांपैकी 32 लाख 80 हजार 998 लाभार्थींना पहिली मात्रा तर 9 लाख 83 हजार 125 लाभार्थींना दुसरी मात्रा देण्यात आली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र या आठ राज्यात 18-44 वयोगटात 50 लाखाहून अधिक जणांना पहिली मात्रा देण्यात आली.


कोरोना महामारीनंतर देशात लसीकरण सुरु होऊन आता सहा महिने होत आले आहेत. मात्र, अजूनही लसीकरण वेगाने होताना दिसत नाहीय. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कोरोना संसर्गामुळे देशात एकूण 4 लाख 312 लोकांचे मृत्यू झाले आहेत. मृत्यूच्या बाबतीत आता आपल्यापुढे युनायटेड स्टेट्स आणि ब्राझील आहे. कोरोनामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होणारा भारत तिसरा देश ठरला आहे.


संबंधित बातम्या :


लसीकरण मंदावल्याचा फटका; भारतात आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू