Congress Protest  : केंद्र सरकारविरोधात काँग्रेसने आज देशभरात आंदोलन केले. महाराष्ट्राच्या विविध भागात देखील काँग्रेसने आंदोलन केले. अदानी समुहातील गैरकारभाराची आणि हिंडेनबर्गच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी, एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर सरकारी वित्तीय संस्थामधील अदानी समूहात केलेल्या गुंतवणुकीची संसदेत चर्चा व्हावी व गुंतवणूकदारांच्या पैशाला शासनाने संरक्षण द्यावे अशा मागण्या काँग्रेसने आपल्या आंदोलनातून केल्या.  


अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली पुण्यात काँग्रेसचं आंदोलन 


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली पुण्यात काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आंदोलन केलं. यावेळी त्यांनी हे आंदोलनं नसून हा  सामान्यांचा जन आक्रोश असल्याचं म्हटलं. "आमच्या भविष्याच्या बाबतीत सरकार नेमकी काय आणि कधी भूमिका घेणार हे माहिती नाही. सामान्य माणसाने रस्त्यावर उतरलं, पाहिजे काँग्रेस पक्ष सामान्य माणसांसोबत आहे. आपणं सगळे एकत्र येऊन आंदोलनं करूया. आज देशभर आंदोलनं होत आहेत. अनेक लोकांचे पैसे एलआयसीमध्ये गुंतेलेले आहेत. देशात आज खूप वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा. सरकारने कारवाई केली पाहिजे. एसबीआय आणि एलआयसीमधील सामान्य लोकांचा पैसा अदानी यांच्या शेअरमध्ये गुंतवले. परंतु, अदानी यांचे शेअर कोसळले आणि सामान्य लोकांचे पैसे बुडाले, ही चिंतेची बाब आहे. सध्या अदानींच्या सगळ्या कंपनी तोट्यात सुरू आहेत. रिपोर्टवर आणि अहवालावर सरकारने आधीच लक्ष द्यायला हवं होतं. तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजे हीच आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे, असे मत अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटले.  


भंडाऱ्यात काँग्रेस आक्रमक


काँग्रेसच्या वतीने भंडाऱ्यात आंदोलन केलं. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शहरातील मिस्किन टॅंक गार्डन परिसरात असलेल्या एसबीआय बँकेसमोर काँग्रेसने निदर्शने आणि आंदोलन केले. यावेळी महिला, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


धुळ्यात जोरदार घोषणाबाजी


एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक वित्तीय संस्थांना अदानी उद्योग समुहात गुंतवणूक करण्यास भाग पाडून सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान करणार्‍या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसने सोमवावारी राज्यव्यापी आंदोलन केले. धुळे शहरात देखील एलआयसी आणि एसबीआय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अदानी आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


अदानी उद्योग समुहामध्ये एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यवधी रूपये गुंतवण्यात मोदी सरकारने भाग पाडले. एलआयसीचे 29 कोटी गुंतवणूकदार आणि स्टेट बँकेच्या 49 कोटी खातेदारांचा कष्टाचा पैसा परत मिळेल का? अशी भीती निर्माण झाली आहे. एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशाचे गौरव आहेत. या वित्तीय संस्थामध्ये सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे. परंतू मोदी सरकारने अदानीच्या कंपन्यांमध्ये हा पैसा बळजबरीने गुंतवला. त्यामुळे अदानी उद्योग समुहातील गैरकाराभाची चौकशी व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली. 


उस्मानाबादमध्ये एलआयसी कार्यालयाबाहेर आंदोलन


उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस एलआयसी ऑफिस समोर उद्योगपती गौतम आदानी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. अदानी उद्योग समुहातील गैरकारभाराची चौकशी करावी आणि LIC, SBI सह इतर सरकारी वित्तीय संस्थांच्या अदानी समुहातील मोठ्या प्रमाणातील गुंतवलेल्या पैशाला संरक्षण मिळावे, यासाठी केंद्र सरकारने योग्य ते निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 


नवी मुंबईत केंद्र सरकारविरोधात नारेबाजी 


नवी मुंबई जिल्हा काँग्रेसने आज केंद्रातील मोदी सरकार विरोधात आंदोलन केले. वाशी येथील एलआयसी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित येत मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. मोदी सरकारने एलआयसीला अदानी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप करत यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकार अदानी आणि अंबानीसाठी काम करत असल्याचा आरोप करत मोदी सरकार हटावचा नारा देण्यात आला.


परभणीत आंदोलन 


अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये सरकारी वित्तीय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवल्याचा आरोप करत आज परभणीत काँग्रेसच्या वतीने एसबीआय आणि एलआयसीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार आणि अदानी समुहाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.


भिवंडीत निदर्शने


ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडीत गौतम अदानी आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. स्टेट बॅंक आँफ इंडिया आणि एलआयसी कार्यालयाबाहेर काँग्रेसने मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ठाणे ग्रामीण काँग्रेस आणि भिवंडी शहर जिल्ह्याचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.