मुंबई : 'आतापर्यंत पकडण्यात आलेले सर्व हिंदू धर्मीय दहशतवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे,' असं खळबजनक विधान करत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी वाद निर्माण केला आहे. "महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसेही संघाशीच संबंधित होता. ही विचारधारा समाजात कटुता पसरवते. यातूनच हिंसेचा जन्म होतो आणि हिंसा लोकांना दहशतवादाकडे घेऊन जाते," असं दिग्वजय सिंह म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सिंहांच्या या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. "भगवा दहशतवाद असं म्हणण्याचं पाप काँग्रेसने कायमच केलं आहे, आता आम्हाला दहशतवादाशी जोडून दंगली भडकवण्याचा तर काँग्रेसचा प्रयत्न नाही ना," असा सवाल संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले दिग्विजय सिंह आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिग्विजय सिंह यांनी 'हिंदू दहशतवादाबाबत आधी केलेल्या वक्तव्यांबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. ते म्हणाले की, "मी कधीही हिंदू दहशतवादावर भाष्य केलेलं नाही, तर मी संघी दहशतवादाबाबत बोलल आहे. भाजपने नेहमीच धर्माच्या नावावर राजकारण करुन विष पसरवण्याचं काम केलं आहे."