Chandrayaan-3 Mission : चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने आज सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रावर लँडिंग केले. इस्रोच्या अथक परिश्रमानंतर भारताने अंतराळात इतिहास रचलाय. भारताच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक होत आहे. चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर भारतामध्ये जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण आहे. गाव खेड्यापासून शहरापर्यंत भारत माता की जय असे नारे दिले जात आहेत. सोशल मीडियावरही शुभेच्छा दिल्या जात आहे. पण विक्रम लँडर चंद्रावर पोहच्यानंतर पुढे काय? चांद्रयान 3 चा पुढील टप्पा काय असेल ? विक्रम चंद्रावर कसे काम करेल... भारताला माहिती कशी पाठवली जाईल ? याची चर्चा सुरु आहे. 


लँडिंगनंतरची प्रक्रिया नेमकी काय ?


चांद्रयान 3 चे तीन भाग आहेत. त्यामधील एक प्रोप्लशन मॉड्यूल, जो लँडरला चंद्राच्या कक्षापर्यंत घेऊन गेला. त्यामधून विक्रम लँडर वेगळा झाला आणि प्रोप्लशन मॉड्यूल चंद्राच्या कक्षामध्ये फिरतोय. त्यामधून दोन भाग वेगळे झाले, त्यामध्ये विक्रम लँडर आणि रोवर प्रज्ञान यांचा समावेश आहे. विक्रम हा लँडर आहे, जो चंद्रावर लँड केलेय, त्यातून रोवर वेगळा होईल. त्यानंतर प्रज्ञान रोवर चंद्रावर फिरेल अन् तेथील डेटा इस्रोला पाठवेल. विक्रमच्या यशस्वी लँडिंगनंतर प्रज्ञान रोवर आपले काम सुरु करेल. 


चांद्रयानच्या मोहिमेचं प्रमुख लक्ष्य काय?


भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. चंद्रयान 3 चे प्रज्ञान रोवर चंद्रावरील पणी, माती, वातावरणासोबत खनिज याबाबतची माहिती गोळा करुन पाठवेल. दक्षिण ध्रुवावर अशी काही ठिकाणं आहेत, जिथे अब्जावधी वर्षांपासून अंधार आहे, कधीही सूर्यप्रकाश पडलेला नाही. अशा ठिकाणावरुन डेटा गोळा करणे रोवरसाठी ऐतिहासिक असेल. रोवरच्या या कामगिरीमुळे अनेक प्रकराच्या संशोधनाला चालना मिळेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एकत्र केलेली सर्व माहिती रोवर लँडरला पाठवेल आणि लँडर ती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल. यासोबतच चंद्राच्या पृष्ठभागावर मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह यांसारख्या घटकांची उपस्थिती शोधण्यात येईल.  चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक कामगिरीमुळे स्पेस सायन्समध्ये भारताचे मोठे योगदान असेल. 


चंद्रयान 3 चं यशस्वी लँडिंग -


भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची... भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेलीय... ऊर आनंदाने भरून आलाय... आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय... ‘चांद्रयान-3’नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. देशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांच्या, देशवासियांच्या अथक परिश्रमांचं हे फळ आहे. 


गर्वय मला, मी भारतीय असल्याचा... कारण, भारताच्या चंद्रयानाने चंद्राला अलिंगन दिलंय... इस्रोचं यान चंद्राच्या कुशीत शिरलंय... आणि महत्त्वाचं म्हणजे, आधीच्या चंद्रमोहिमांच्या अपयशाची जळमटं क्षणार्धात कुठल्या कुठं झटकून टाकली गेलीयत... भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे... भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या... जसजसा लॅण्डिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली... श्वास रोखले गेले... हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले... आणि बातमी आली... चांद्रयान- ३ मोहीम फत्ते झाली... प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले... आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले... आपल्याच घरातलं कुणीतरी परीक्षेत फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाल्याची भावना निर्माण झाली. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातलीय.