NFBS : घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू (Death) झाल्यास कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. अशातच कुटुंबाचा भार चालवणं कठीण होतं. याच परिस्थितीमध्ये मदत म्हणून केंद्र सरकारतर्फे नवीन योजना लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारतर्फे अशा कुटुंबांना 20 हजार रुपयांची मदत केली जाते. या योजनेला 'नॅशनल फॅमिली बेनिफिट स्किम'  (NFBS) म्हटले जाते. या योजनेचे नेमके नियम काय आहेत? यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? नेमक्या कोणत्या कुटुंबांना मदत मिळते हे जाणून घेऊया.


1. काय आहे योजना?


कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे अचानकच निधन झाल्यास ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे अशा कुटुंबांना 20 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.


2. नैसर्गिक मृत्यू झाल्यास मदत मिळणार का?


घरातील कमवत्या व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास तरीही त्या कुटुंबास मदत मिळणार. मग ती घरातील व्यक्ती पुरुष असो वा स्त्री.


3. घरातील स्त्रीचा मृत्यू झाल्यास काय?


घरातील स्त्रीचा मृत्यू झाल्यास त्याही स्त्रीला  कमावणारी समजलं जाईल. त्या कुटुंबालाही मदत मिळेल.


4. सगळ्या कुटुंबांना ही योजना लागू होते का?


निधन झालेल्या व्यक्तीचे वय 18 ते 60 वर्षे वयोगटादरम्यान असेल तर कुटुंबाला या योजनेअंतर्गत मदत मिळेल.


5. अशा कुटुबांची व्याख्या काय आहे?


विवाहित दम्पत्य, लहान मुले, लग्न झालेल्या मुली, आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेले पालक या सगळ्या कुटुंबांचा समावेश आहे.


6. या योजनेअंतर्गत पैसे मिळवण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार?



  • ओळखपत्र

  • वास्तव्याचा पुरावा

  • आधार पॅन लिंक बँक अकाऊंट डिटेल्स

  • मोबाईल नंबर

  • आधार कार्ड

  • कुटुंबप्रमुखाचा वयाचा पुरावा

  • अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो


7. निधन झालेल्या व्यक्तीसंदर्भात कोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत



  • मृत्यूचा दाखला

  • ओळखपत्र किंवा आधार कार्ड

  • वास्तव्याचा दाखला

  • पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड


8. रक्कम जमा होण्यासाठी कशी मिळेल मदत?


कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबियांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येईल.


9. को-ऑपरेटिव्ह बँकेत खाते असल्यास मदत मिळणार का?


मदत मिळण्यासाठी नॅशनल बँकेत खाते असणे गरजेचे आहे.


10. कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला हे सांगण्याची जबाबदारी कोणाची असणार?


मदत हवी असल्यास संबंधित कुटुंबातील व्यक्तीने बँकेच्या व्यवस्थापकाला संपर्क करावा.


11. ही योजना कोणालाठी लागू असणार?



  • अर्ज करणारा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

  • कुटुंब दारिद्र्यरेषेच्या खाली असणं अपेक्षित आहे.

  • अर्ज करणारा व्यक्ती मृत व्यक्तीचा वारसदार असावा.


12. आई-वडील दोघेही कमावते आहेत, आईचं उत्पन्न वडिलांपेक्षा जास्त आहे, आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं,  अशा कुटुंबाला मदत मिळेल का?


आईची नोंद कुटुंबप्रमुख अशी होऊन त्या कुटुंबाला मदत मिळेल.


13. योजनेसाठीच्या लाभार्थीची निवड कशी करण्यात येईल?



  • जिल्हाधिकारी आणि तालुका पातळीवर निवड समितीची स्थापना केली जाईल. अर्जदाराने केलेल्या अर्जाची तपासणी करण्यात येईल.

  • अर्ज विहित निकषांमध्ये बसत असेल तर संबंधित अर्जदाराला मदत मिळेल.

  • लाभार्थींची निवड ग्रामपंचायतीद्वारे केली जाईल.


14. अर्ज कुठे करायला हवा?


योजनेअंतर्गत पैसे मिळावेत यासाठी जवळच्या सेवा केंद्रात ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.
अर्ज डाऊनलोड करावा. तो अर्ज भरुन जिल्हा सामाजिक कल्याण अधिकाऱ्याकडे द्यावा.


15. ऑनलाईन अर्ज करता येणार का?


होय, यासाठी केंद्र सरकारच्या MyGov.India या वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो.


16. योजना तसंच अर्जासंदर्भात अधिक माहितीसाठी कोणाशी संपर्क करावा?


अधिक माहितीसाठी जवळच्या सामाजिक कल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.