नवी दिल्ली :  CBSE बोर्ड परीक्षांसंदर्भात आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.    
 
CBSE दहावी-बारावीची परीक्षा रद्द करा, अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारकडे विनंती


कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करावी अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केली आहे. राजधानी दिल्लीला कोरोनाचा हॉटस्पॉट बनवण्यापासून वाचवायचं असेल तर या परीक्षा रद्द कराव्या, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. लाखो विद्यार्थी आणि सुमारे एक लाख शिक्षक परीक्षेच्या प्रक्रियेत सहभागी होणं म्हणजे राजधानी दिल्ली कोरोनाचा हॉटस्पॉट बनेल आणि त्यानंतर परिस्थिती हाताळणं कठीण होईल.


...तर दिल्ली कोरोनाचा हॉटस्पॉट बनेल : केजरीवाल 


अरविंद केजरीवाल म्हणाले की, "दिल्लीमध्ये सहा लाख विद्यार्थी सीबीएसईची परीक्षा देणार आहे. तर सुमारे एक लाख शिक्षक परीक्षा घेतील. यामुळे दिल्लीत कोरोनाचा हॉटस्पॉट तयार होईल. माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की, सीबीएसई परीक्षा रद्द करण्यात यावी."


महाराष्ट्रातील दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली


कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :