Bihar Elections 2020 : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज (गुरुवारी) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहारचे भाजप अध्यक्ष संजय जायस्वाल यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत पाटण्यात भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. बिहार निवडणुकीसाठी भाजपने 11 मोठे संकल्प केले असून सत्तेत आल्यानंतर ही सर्व आश्वासनं पूर्ण करण्याचा दावाही केला आहे. तसेच भाजपने भाजपची सत्ता आल्यानंतर संपूर्ण बिहारमध्ये कोरोना लसीचं वितरण मोफत करणार असल्याचा दावा केला आहे. त्याचसोबत बिहारमध्ये 19 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासनही दिलं आहे.


भाजपने बिहार निवडणुकींसाठी 'भाजप है तो भरोसा है' 5 सूत्रं, एक लक्ष्य, 11 संकल्प' असा नारा दिला आहे. बिहारच्या राजधानीचं शहर असलेल्या पाटण्यात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भाजप नेते भूपेंद्र यादव आणि इतर नेत्यांनी पत्रकार परिषदेत भाषणंही केली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बोलताना सांगितले की, कोरोना लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत मास्क हाच उपाय आहे. परंतु, कोरोना लस भारतात आल्यानंतर तिचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन भारतातच केलं जाईल. जर भाजपची सत्ता आली तर कोरोना व्हायरसवर प्रभावी असलेली लस बिहारमधील लोकांना मोफत देण्यात येईल.'





निर्मला सीतारमण म्हणाल्या की, 'जनतेने एनडीएला मोठ्या प्रमाणात मतदान करून जिंकून द्यावं. नितीशकुमार पुढच्या 5 वर्षांसाठी बिहारचे मुख्यमंत्री असतील. त्यांच्या नेतृत्त्वात बिहार भारताचे प्रगतशील आणि विकसित राज्य होील. मोदी सरकारने घरात मोफत गॅस सिलेंडरचं वितरण केलं आहे. गरीबांसाठी बँकेत खाती उघडली आणि कोरोना काळात प्रत्येक गरजूला दीड हजारांची आर्थिक मदतही दिली आहे.'





बिहार निवडणुकीसाठी भाजपचे 11 संकल्प :


1. कोरोनाच्या लसीचं विनामुल्य वितरण


2. विद्यालयं, उच्च शिक्षण विद्यालयं आणि संस्थांमध्ये 3 लाख नव्या शिक्षकांची नियुक्ती


3. बिहारला आयटी हबच्या स्वरुपात विकसित करणार


4. 1 कोटी महिलांना स्वावलंबी करणार


5. आरोग्य विभात 1 लाख नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करणार


6. आता डाळींची खरेदीही एमएससी दरांनुसार करणार


7. 30 लाख लोकांना 2022 पर्यंत पक्की घरं देणार


8. बिहारमध्ये दुसऱ्या एम्स 2024 पर्यंत तयार करणार


9. 2 वर्षांमध्ये 15 नवीन खाजगी आणि कंफेड आधारित प्रक्रिया उद्योग तयार केले जातील.


10. पुढिल दोन वर्षांमध्ये इनलँड म्हणजेच, गोड पाण्यात माशांचं उत्पादन करणार


11. 10 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार


दरम्यान, बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशी तीन टप्प्यांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानंतर 10 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. कोरोना काळात पार पडणारी ही सर्वात मोठी निवडणूक असणार आहे.