नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर औषध किंवा लस येण्यावर रोज वेगवेगळे दावे आपण ऐकत असतो. अशात अमुक खाल्ल्याने कोरोना बरा होतो, म्हणणारे दावेही आपण ऐकले. यात एक दावा केला होतो केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी. पापड खाल्ल्याने कोरोना व्हायरस ठीक होईल, असा दावा त्यांनी केला होता, नंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याच मंत्री मेघवाल यांना आता कोरोनाची लागण झाली आहे.  शनिवारी मेघवाल यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गृह मंत्री अमित शाह यांच्यानंतर केंद्र सरकारचे 2 मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि कृषि राज्यमंत्री कैलाश चौधरी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.  मेघवाल आणि चौधरी या दोघांनीही ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मेघवाल यांनी काय केला होता दावा संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांच्या हस्ते एका खासगी कंपनीचा पापड लाँच करण्यात आला होता. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  पापड लाँच कार्यक्रमात मेघवाल म्हणाले होते की, कोरोनाचा सामना करण्यासाठी या पापडाने आवश्यक अँटीबॉडीज तयार होतील, हे आत्मनिर्भर भारतअंतर्गत ‘भाभीजी पापड’ नावाने एका खासगी उद्योजकाने पापड तयार केले आहेत. या पापडामुळे कोरोना व्हायरस सामना करण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज तयार होतील. कोरोनाशी लढण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतील. माझ्या त्यांनी शुभेच्छा आणि ते यशस्वी होती अशी मला आशा आहे, असं ते म्हणाले होते. या व्हिडीओमुळे मेघवाल चांगलेच चर्चेत आले होते.