Andhra Pradesh CM Plane Emergency Landing: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांना घेऊन जाणाऱ्या एका विशेष विमानाचे सोमवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे विमानाला गन्नावरम विमानतळावर (Gannavaram Airport) इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमान सुरक्षितपणे उतरले आहे. मुख्यमंत्री रेड्डी (Jagan Mohan Reddy) आज दिल्लीला (Delhi) निघालेले असताना ही घटना घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) आणि अधिकाऱ्यांचे पथक आज सायंकाळी 5.03 वाजता दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले होते. मात्र काही वेळानंतर वैमानिकाला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. यानंतर विमान पुन्हा विजयवाडा येथील विमानतळावर सायंकाळी 5:27 वाजता उतरवण्यात आले. यानंतर रेड्डी त्यांच्या ताडेपल्ली येथील निवासस्थानी पोहोचले. विमान सुखरूप उतरल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचा विचार अधिकारी करत आहेत. 






CM & DCM Jalgaon Visit Cancelled : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात तांत्रिक बिघाड 


तत्पूर्वी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगावला घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड आढळल्याने त्यांचा नियोजित जळगाव (Jalgaon) दौरा रद्द झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस 'बंजारा कुंभ 2023' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईपासून (Mumbai) 415 किमी अंतरावर असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे जात होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या (CMO) अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाने मुंबईहून उड्डाण केले होते, परंतु खराब हवामानामुळे ते परतावे लागले. अधिकाऱ्याने सांगितले की शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीस (Devendra Fadnavis) नंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सामील झाले. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय विमानात बिघाड होण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. याआधी 5 जानेवारी रोजी या विमानात बिघाड झाला होता. एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे औरंगाबाद आणि पुण्याच्या दौऱ्यावर जाणार होते. पण त्याचवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने शिंदे आणि फडणवीस या दोघांनाही एअरपोर्टच्या व्हीआयपी वेटिंग रुममध्ये थांबावं लागलं. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोघांनाही जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ ताटकळावं लागलं. तरीही विमान दुरुस्त होऊ न शकल्याने आणि दुरुस्तीसाठी वेळ लागणार असल्याचे समजल्यावकर मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.