वाराणसी : उत्तर प्रदेशात भाजप सरकार येताच अवैध कत्तलखाने बंद होतील, या भाजपच्या घोषणेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर दोनच दिवसात वाराणसीमधील अवैध कत्तलखाना बंद करण्यात आला आहे.


वाराणसीतील स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. शिवाय या कत्तलखान्यातून 60 जनावरंही जप्त करण्यात आली आहेत. चालक वैध कागदपत्र सादर न करु शकल्याने ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी शपथ घेताच अलाहाबादमध्ये दोन अवैध कत्तलखाने बंद करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदार संघ वाराणसीमध्ये ही कारवाई करण्यात आली.

भाजपने उत्तर प्रदेशच्या जाहीरनाम्यात कत्तलखाने बंद करण्याची घोषणा केली होती. भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल, त्या दिवशी रात्री 12 वाजता अवैध कत्तलखाने बंद करण्याची मोहिम सुरु होईल, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह प्रचारसभेत म्हणाले होते.

गाझियाबादमध्ये पोलिसांनी बेकायदेशीरपणे चालणारी 10 मांस दुकाने आणि चार कत्तलखाने बंद केले आहेत. तर आतापर्यंत 10 जणांनी स्वतःहून कत्तलखाने बंद केले आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

15 मार्च ते 21 मार्च या काळात एकूण 34 मांस दुकाने आणि कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत. येत्या काळात ही कारवाई सुरुच राहील, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

संबंधित बातमी :  ... त्यादिवशी रात्री 12 वा. 'यूपी'तील सर्व कत्तलखाने बंद होतील : शाह