नवी दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केल्यानंतर, आता दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रांनी केजरीवालांना थेट निवडणुकीचं आव्हान दिलं.


केजरीवाल यांना मिश्रांनी एक पत्र लिहिलं. ज्यात त्यांनी केजरीवाल यांना आपल्याविरोधात निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं आहे.

"केजरीवाल यांनी जर पैसे घेतले नसतील, तर त्यांनी आपल्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवून निर्दोषत्व सिद्ध करावं" असं आव्हान मिश्रांनी दिलं आहे.

केजरीवाल यांनी मतदारसंघ ठरवावा, आपण त्या मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरु असं चॅलेंज मिश्रांनी दिलं आहे. त्यामुळं आता आपल्या पक्षातील माजी मंत्र्याच्या या आव्हानाला केजरीवाल स्वीकारतात की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

'केजरीवालांनी माझ्यासमोर 2 कोटी घेतले'

अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून कोटी रुपये घेतल्याचा आरोप दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. सत्येंद्र जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये दिल्याचं आपण स्वतः पाहिलं, असा सनसनाटी आरोप मिश्रा यांनी केला आहे.

50 कोटींच्या जमीन व्यवहारासाठी हे पेसै दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केजरीवालांच्या एका नातेवाईकासाठी जमीन व्यवहार प्रकरणी ही पैशांची देवाणघेवाण झाल्याचा दावा मिश्रांनी केला आहे.

जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये देताना मी स्वत: पाहिलं, त्यानंतर रात्रभर झोपू शकलो नाही, असंही कपिल मिश्रा म्हणाले. दिल्लीच्या जल, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रिपदावरुन कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मिश्रा हे कुमार विश्वास यांचे निकटवर्तीय नेते मानले जातात.

मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश करु - केजरीवाल

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी आज ट्विट करून मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश विधानसभेत करणार असल्याचं म्हटलं आहे.

दिल्ली सरकारने आज विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्यातील कथित 2 कोटीच्या व्यवहाराबाबत कपिल मिश्रा यांनी केलेल्या खुलास्यावरुन, विधानसभेत खडाजंगी होण्याची चिन्हं आहेत. मात्र त्यापूर्वीच केजरीवालांनी ट्विट केलं आहे. ते म्हणतात, " देशात सुरु असलेल्या एका सर्वात मोठ्या षडयंत्राचं सत्य आज सदनात सौरभ भारद्वाज देशासमोर आणतील. त्यांना जरुर ऐका. सत्यमेव जयते".

https://twitter.com/ArvindKejriwal/status/861823466206445568

आयकरची 'आप'ला नोटीस

आम आदमी पार्टीच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कारण आयकर विभागानं आम आदमी पार्टीला नोटीस पाठवली आहे.

20 हजारांहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची माहिती आम आदमी पार्टीकडे नाही. त्यामुळं 15 मे पर्यंत हजर राहण्यासंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

आयकर विभागानं आतापर्यंत बाराहून अधिक नोटीस पाठवल्या असून 'आप'नं कुठलंही उत्तर दिलं नसल्याचंही समजतं. त्याचबरोबर आपनं इतर संस्थांना जी कागदपत्रं सोपवली आहेत,त्यातही फेरफार झाल्याचा आरोप होत आहे.

संबंधित बातम्या

केजरीवालांनी सत्येंद्र जैनांकडून दोन कोटी घेतले : कपिल मिश्रा

कपिल मिश्रांच्या आरोपानंतर अण्णा हजारेंचं केजरीवालांवर टीकास्त्र 


'करावे तसे भरावे', रॉबर्ट वढेरांचा केजरीवालांवर निशाणा