रायपूर : छत्तीसगडच्या कांकेरमध्ये बीएसएफ जवानांमध्ये आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात 4 जवान शहीद झालेत तर काही जवान जखमी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला मोठा असल्याचं मानलं जात आहे. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यामधील कांकेर जिल्ह्यात हा हल्ला झाला.


महाला परिसरातील जंगलामध्ये बीएसएफ जवान गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केला. यानंतर बीएसएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले असून, दोन जवान जखमी झाले आहेत. शहीद झालेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कॉन्स्टेबलचा समावेश असल्याची माहिती कांकेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक किरण राठोड यांनी दिली.

या हल्ल्यातील जखमी जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. या पार्श्वभूमीवर हा हल्ला मोठा असल्याचं मानलं जात आहे. नक्षलवाद्यांनी या हल्ल्यातून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा संदेश दिला असल्याचं सांगितलं जात आहे. याआधी नक्षलवाद्यांनी बस्तर, कांकेरसह महाराष्ट्रात गडचिरोलीमध्ये बॅनर्स लावून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यास सांगितलं होतं.

काही दिवसांपूर्वी गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी बॅनर्स लावत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. तसेच उमेदवारांना नक्षली जन अदालतमध्ये उभे करण्याचे आवाहन देखील केले होते.  भाजप, आरएसएस आणि हिंदुत्ववादी संघटनांनी देशातील श्रमिकांचे नुकसान केल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केला होता. जनतेविरोधी भाजपला धडा शिकवा. दलित, मुस्लिम, आदिवासी, इतर मागासवर्गीय, महिलाविरोधी भाजपला धडा शिकवा, असे नक्षलवाद्यांनी लावलेल्या पोस्टरद्वारे म्हटले होते.  मत मागायला आलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांना जनअदालत मध्ये उभे करुन त्यांना प्रश्न विचारा, असे आवाहन नक्षलवाद्यांनी केले होते.