मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
कोठी-कोरणार पुलाचा काही भाग वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद पडली आहे, या प्रकारामुळे गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले

गडचिरोली : पावसाळा (Rain) आला की रस्त्यावरील खड्डे आणि विविध भागातील पुलांच्या विरादरक स्थितीचे चित्र पाहायला मिळते. तसेच, संबंधित बांधकाम किंवा कामाच्या ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उभे राहतात. काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याने मोठा राजकीय वादंग झाल्याचंही पाहायला मिळालं. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात स्पष्टीकरण देखील दिले होते. आता, मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे (Gadchiroli) पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते तीन वर्षापूर्वी उद्घाटन झालेला कोठी-कोरणार पूल पुरामुळे खचला तर काही भागच वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावरुन, विरोधी पक्षातील नेत्यांनी पुन्हा एकदा शासनाच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कोठी-कोरणार पुलाचा काही भाग वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद पडली आहे, या प्रकारामुळे गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेला पूल इतक्या कमी कालावधीत निकामी झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजी त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि त्यावेळचेच अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत या पुलाचे उद्घाटन झाले होते. क्रांतिवीर बाबुराव शेडमाके असे या पुलाला नाव देण्यात आले होते. मात्र, तीन वर्षांतच पूल खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण, तांत्रिक देखरेख आणि कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आता काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आझाद समाज पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि जबाबदार अधिकारी, कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन या पुलाचे फोटो शेअर केले आहेत, तसेच आमच्यावर देशद्रोहाचा शिक्का पडायचा, असा खोचक टोलाही रोहित पवारांनी लगावला.
आमच्यावर देशद्रोहाचा शिक्का पडायचा - रोहित पवार
आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आपण पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आपणच उद्घाटन केलेला पूल 3 वर्षे व्हायच्या आतच खचला.. छे… छे… खचला नाही.. कदाचित तीन वर्षांची durability चेक करत असतील असतील किंवा हे एखादं नवीन डिझाईन असावं, जे पाऊस उघडताच पुन्हा मूळ रूपात दिसेल. पूल खचला म्हणलं तर कदाचित आमच्यावर देशद्रोहाचा शिक्का पडायचा, असे म्हणत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. तसेच, दलालीच्या दलदलीत मजबूत कामाची अपेक्षा तरी कशी ठेवणार? आज केवळ पूल खचला, पण गेल्या तीन-चार वर्षांत इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली cost escalation करून भ्रष्टाचार आणि दलालीच्या खांबांवर उभं केलेलं आपलं सरकारही एक दिवस असंच खचल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की! असेही रोहित पवार यांनी म्हटले.
हेही वाचा
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?




















