मुंबई : नव्या कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला होता. या भारत बंदला देशभरातून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातही या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. भारत बंद मुंबईत मात्र तुरळक प्रतिसाद मिळाला. लोकल ट्रेनही सुरळीत सुरु होत्या. सायन पनवेल हायवेवर रास्तारोकोचा प्रयत्न करण्यात आला होता.


नाशिक


नाशिक- भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी कडकडीत बंद पुकारला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू होते. बाजार समितीने आधी कल्पना दिली नसल्याचे व्यपाऱ्यांचं म्हणणं आहे, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातहुन गाजर, मिरची, वाटाणा हा शेतीमाल तीन दिवसांपासून नाशिकच्या दिशेनं निघाला होता. तो शहरात पहाटे दाखल झाला, त्यामुळे बंदला पाठिंबा देत नुकसान टाळण्यासाठी व्यवहार करावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे


सोलापूर


शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली आहे. बाजारात अगदी पहाटे पासून सुरू होणारे लिलाव आज बंद पाहायला मिळाले. कांदा, भुसार, किराणा मालाची बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. तर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी किरकोळ भाजी विक्री करण्यात येणारी भाजी मंडई मात्र सुरूच ठेवण्यात आली आहे. शेतकरी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंद करण्याची हाक देण्यात आली होती. त्यानुसार काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडते, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार या सर्वांची एकत्रितपणे बैठक पार पडली. त्यानुसार बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज बंद मध्ये सर्वच घटक सहभागी झाल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे.


नागपूर


नागपूरचे प्रसिद्ध संत्रा मार्केटमधील व्यवहार सुरू आहेत. व्यापारी आपले माल विक्रीसाठी घेऊन बसले आहेत. दुकाने उघडी आहेत. मात्र रोजच्या तुलनेत ग्राहक आणि विक्री कमी झाली. नाशवंत माल असल्याने आमचा नाईलाज असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


बुलडाणा


बुलडाणा जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 नांदुरा येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात अडवला होता. काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जवळपास 500 कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.  बुलढाणा जिल्ह्यात 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याच चित्र पाहायला मिळालं. बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. आज सर्व शाळा महाविद्यालय बंद होत्या. मात्र लांब पल्ल्याच्या तुरळक एसटी बसेस धवताना दिसल्या.