नागपूरः आगामी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीवर राज्यातील महाविकास आघाडीतील फाटाफूटचा परिणाम होणार आहे. याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेला बसणार आहे, हे निश्चितच. मनपामध्ये मागिल 15 वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता आहे. सत्तेत असलेल्यांना घेण्याचे अनेक ज्वलंत मुद्देही आहेत. मात्र विरोधकांमध्येच एकी नसल्याने यंदाही भाजपसाठी मनपा निवडणुका सोयीच्या जाणार असल्याचे चित्र आहे.


भाजपला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेने एकत्रितपणे महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचे प्रयत्न शहरात सुरु केले होते. राष्ट्रवादी व शिवसेनेने जागांबाबत थोडे नमते घेण्याची तयारीसुद्धा दर्शविली होती. शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक असल्याने कॉंग्रेसतर्फे महापालिकेत महाविकास आघाडी करण्यास नकार दिला जात होता. दुसरीकडे मात्र काही जागा सोडण्याची तयारीसुद्धा दर्शविली होती. मात्र अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे सर्व तयारी फिस्कटली आहे. शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. तसेच शहरातील पदाधिकाऱ्यांमधील भांडणे वाढतच चालली आहे. त्यांच्यातील वाद शमण्याची कुठेही चिन्ह सध्या दिसत नाहीत. शिवसेना सोबत आली नाही तर चालेल पण राष्ट्रवादीने कॉंग्रेससोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तीन सदस्यांच्या प्रभागात आपली ताकद पुरणार नाही याची पूर्ण जाणीव राष्ट्रवादीला आहे. मात्र आमच्याकडे गमावण्यासारखे काही नाही, सर्व जागा लढल्यास त्याचा फटका कॉंग्रेसलाच बसेल असा तर्क मांडून आघाडी करण्यासाठी कॉंग्रेसवर दबाव टाकला जात होता. हे लक्षात घेता काही प्रबळ उमेदवारांसाठी जागा कॉंग्रेसने सोडाव्यात, असा प्रयत्नही चालविला होता. प्रभागातील सलग तीनही जागेऐवजी काही प्रभागांमध्ये प्रयत्येक एक जागा सोडल्यास अधिक सोयीचे होईल, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.


सेना-राष्ट्रवादीने एकत्र लढण्यासाठी प्रयत्न


महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचे काही बडे नेते राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र लढावे असा सल्ला देत आहे. मुंबई-पुण्याची परिस्थिती वेगळी आहे. नागपुरमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे फारसे अस्तित्व नाही. येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही आपसात मतभेद आहेत. शहरातील काही पॅकेटमध्ये वैयक्तिक स्तरावर मतदान वळण्याची क्षमता मोजक्या उमेदवारांमध्ये आहे. मात्र, तीन सक्षम उमेदवार आणि प्रत्येकाचे चिन्ह वेगळे ठेऊन लढणे ही मोठी अडचण त्यांच्यासमोर आहे.


मतांचे विभाजन अटळ


कॉंग्रेसच्या उमेदवारांसोबत एक जागा जिंकताना फारशी दमछाक होणार नाही आणि मतांचे विभाजन होणार नाही, असे सर्वांचे प्रयत्न सुरू होते. आता महाविकास आघाडीत फाटफूट झाली आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीसाठी जागा सोडेल ही आशा जवळपास संपुष्टात आली आहे.


राज्यात सरकार अस्तित्वातच नाही, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही : संजय राऊत