पालघर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देताना मोदी साहेबांच्या भरवशावर शब्द दिला होता का? सरकार तयार करताना मोदी आठवले नाहीत का? असे सवाल करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी स्व. बाळासाहेबांना दिलं होतं. मात्र ते काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत मुख्यमंत्री करेन असं होत का? असा सवाल त्यांनी केला. आता मातोश्रीवरून आदेश येत नाहीत तर दिल्लीच्या मातोश्री सोनियाजी आदेश देतात, असेही फडणवीस म्हणाले. बाळासाहेब यांना आज काय दुःख झालं असेल, असेही ते म्हणाले.


महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान करून जनतेशी विश्वासघात करून स्थापन झालेल्या राज्य सरकारकडून आता राज्यातील शेतकर्‍यांच्या विश्वासघाताची मालिका प्रारंभ झाली आहे, असा आरोप फडणवीस यांनी आज पालघर येथे बोलताना केला. सहा जिल्ह्यात होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर जिल्ह्यातील कासा(वरोती) येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला.

ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने अतिशय योग्य असाच कौल दिला होता. निवडणुकीआधी झालेल्या युतीला त्यांनी स्पष्ट बहुमत दिले होते. त्यामुळे त्यांची काहीच चूक नाही. मी त्यांचे आभार मानण्यासाठी येथे आलो आहे. पण, आमच्या मित्रांनी जनादेशाचा विश्वासघात केला आणि नव्या मित्रांशी घरोबा केला. आता त्यांनी निदान राज्यातील सरकार नीट चालवायला हवे. विश्वासघात हा जसा या सरकारच्या गठनाचा पाया आहे. तसेच आता त्यांनी आपल्या एकेक निर्णयातून जनतेच्या, शेतकर्‍यांच्या विश्वासघाताची मालिका सुरू केली आहे, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, नव्या कर्जमाफी योजनेतून त्यांनी अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना मुद्दाम वगळले. त्यामुळे त्यांना कोणताही लाभ यातून मिळू शकत नाही. आमच्या मासेमार बांधवांना कुठलीही मदत मिळू शकत नाही. ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे सर्वाधिक नुकसान झाले. पण सप्टेंबर 2019 ची अट टाकल्याने हे शेतकरी मदतीला मुकणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार होते. मात्र शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, विश्वासघात हा ज्या सरकारचा पाया आहे, ते सरकार कधीही फार काळ टिकू शकत नाही, असेही त्यांनी सांगितलं. सरकार बनल्यापासून या सरकारचा गोंधळात गोंधळ सुरू आहे. विभिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र काम करू शकत नाहीत हे स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे सांगतात की राज्यातील जनतेला आनंद व सुख समाधान द्यायचं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षाचे आमदार आणि शिवसैनिक आनंदी नाहीत अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.



फडणवीस यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्यांनी यांचा सात बारा कोरा केला पाहिजे
- आदिवासींना वन पट्टे देण्याचं काम आमच्या सरकारकडून
- पाच वर्षांच्या कामावर जनतेने आपल्याला कौल दिला होता
- ज्या निवडणुका झाल्या त्यात आपल्याला यश
- बेईमानी कशी झाली ते जनतेला सांगा
- एकीकडे सावरकरांना शिव्या दिल्या तरी शिवसेना निमूटपणे
- नागरिकता कायद्यावर तुमची भूमिका काय ते स्पष्ट करा
- मातोश्री वरून आदेश आता येत नाही, दिल्लीच्या मातोश्री सोनियाजी आदेश देतात
- काल परवा मंत्रिमंडळ तयार झालं मात्र त्यानंतर काय झालं ते सगळ्यांना माहीती आहे
- काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचंच कार्यालय फोडलं
- बेईमानींनी सरकार तयार केलं तशी बेईमानी पहिल्या दिवसापासून सुरू केली
- काळजीवाहू सरकार असताना देखील आम्ही 10 हजार कोटी दिले
- त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी 25 हजार हेक्टरी देण्याची मागणी
- 25 हजारांचं आश्वासन देणार सरकार आलं मात्र शेतकऱ्यांच्या या हाती भोपळा आला