मुंबई : पुराव्यांची खातरजमा केल्यानंतरच कोरेगाव भीमा प्रकरणात डाव्यांविरोधात गुन्हे दाखल केल्याचं माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासावर संशय उपस्थित करणाऱ्या शरद पवार यांना दीपक केसरकरांनी धक्का दिला आहे. सबळ पुराव्यांची खातरजमा केल्यानंतरच कोरेगाव भीमा प्रकरणात डाव्यांविरोधात गुन्हे दाखल केल्याचं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात पोलिसांना हाताशी धरून भाजप सरकारनं जाणूनबुजून डाव्यांना टार्गेट केल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहन, त्यांनी एसआयटीमार्फत तपास करण्याची मागणी केलीय. मात्र भाजप सरकारच्या काळात दाखल झालेले गुन्हे योग्य असल्याचं म्हणत केसरकरांनी पवारांचा आरोप खोडून काढलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.


कोरेगाव भीमा दंगल हे तत्कालीन सरकारचं षडयंत्र, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र 

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी मूळ सूत्रधार बाजूला ठेवून बुद्धीजीवींना अटक हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेलं षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला होता. तसंच यासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

एल्गार परिषद, कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात, पुणे पोलीस अडचणीत 

यानंतर गृहमंत्र्यालयाने काल (23 जानेवारी) याबाबत आढावा बैठक घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभुराज देसाई या बैठकीला उपस्थित होते. यासंदर्भात आणखी एक आढावा बैठक होण्याची शक्यता आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणी तपास यंत्रणेवर आरोप झाले आहेत. विशेषतः पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काही जणांना अर्बन नक्षल म्हणत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. नेमकी कशाच्या आधारावर ही कारवाई झाली, अशीही विचारणा बैठकीत करण्यात आली होती.

Bhima-Koregaon | भीमा-कोरेगावबाबत पुरावे समोर ठेवले जातील, कारवाई पुराव्यांच्या आधारेच झाली - दीपक केसरकर

शरद पवारांनी पत्रात काय म्हटलंय?
"पोलिस तपास यंत्रणेने संगणकीय उपकरणांमध्ये छेडछाड केली. पुरावे नष्ट करणे आणि खोटे पुरावे तयार करणे अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या याची खोलात जाऊन चौकशी आवश्यकता आहे. कोरेगाव भीमा दंगलीला एल्गार परिषदेतील चिथावणीखोर जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यामधील काही जणांचा माओवाद्यांशी संबंध असण्याच्या संशयावरुन कारवाई करण्यात आली. कारवाई झाली त्यात ही बुद्धीजीवी आणि प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे. म्हणून याप्रकरणी एसआयटी नेमावी," असं शरद पवार यांनी पत्रात लिहिलं आहे.

शरद पवार यांनी पुढे लिहिलं आहे की, "अटक झालेल्या सुधीर ढवळे यांनी जर्मन कवीची अनुवादीत कविता वाचल्यामुळे त्यांना अटक केली. तर डॉ. आनंद तेलतुंबडे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातजावई आहे, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. 'गोलपीठा'मध्ये नामदेव ढसाळ यांची कविता आहे. ती साहित्यिक अर्थाने बोध घेण्याऐवजी ते देशद्रोह आणि समाजविघातक म्हणून निष्कर्ष काढू नये."