छत्रपती संभाजीनगर: महायुती तुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून सुरू असलेला वाद आता नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र दिसून येत आहे. भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर संतप्त कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची गाडी रोखून धरली, तर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळे फासून आपला तीव्र निषेध नोंदवला. एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी पोलिस संरक्षणात सावे आणि कराड यांनी काढता पाय घेतला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारीवरून भाजपमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. संतापलेल्या इच्छुक उमेदवारांनी आणि संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप नेते भागवत कराड आणि अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला, यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले. यावेळी संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सावे आणि कराड यांचे फोटो फाडले. इच्छुक उमेदवारांनी घटनास्थळी गोंधळ घातल अंगावरती पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सावेंच्या पीएला आणि नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप केला आहे.
संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सर्वे दाखवत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. अतुल सावेंना नेमकं काय भेटलं, त्यांनी त्यांच्या पीएला उमेदवारी दिली, त्यांनी फक्त वंजारी लोकांना पुढे केलं, त्यांनी आत्ताच्या आत्ता सर्वे आणावा, जर त्यात माझं नाव नाही आलं तर मी आयुष्यभर त्यांची गुलामी करेन, भागवत कराडांनी फक्त वंजाऱ्यांना तिकीट दिलं, असं म्हणत कार्यकर्त्यांनी अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. एकेरी शब्दात उल्लेख करत कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचंही यावेळी दिसून आलं.
भागवत कराड यांच्या गाडीला घेराव घालत संतप्त कार्यकर्त्यांनी गाडी आडवली, गाडीवरती काळं फासलं. यावेळी महिला कार्यकर्त्या देखील संतप्त झाल्याचं दिसून आलं. त्यांनी कार्यकर्त्यावरती अन्याय केला आहे. भाजप कोणाच्या बापाचा पक्ष नाही असंही संतप्त कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. घटनास्थळी मोठा राडा झाल्याचं चित्र दिसून आलं. छत्रपती संभाजीनगरमधील भाजपच्या कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी हा अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. आमच्या घरी हे नेते येत होते, त्यासाठी आम्ही लाखो रूपये खर्च केले, आम्हाला उमेदवारी देऊ असं लॉलीपॉप दाखवलं, आम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत सांगितलं मात्र तिकीट दिलं नाही, यांच्या सर्व उमेदवार पडणार आहेत म्हणत संतप्त महिला कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
नेत्यांच्या पीएला तिकीट, कार्यकर्त्यांवर अन्याय
"मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो, रात्रंदिवस पक्षासाठी झटलो, पण साहेबांनी त्यांच्या पीएला तिकीट देऊन माझा घात केला," असा आरोप भदाने पाटील या संतप्त कार्यकर्त्याने केला. "मला अंधारात ठेवले गेले, आता जर मला काही झाले तर त्याला नेतृत्व जबाबदार असेल," असा इशाराही त्याने दिला. तसेच कराड यांनी जातीवर आणि सावे यांनी त्यांच्या पीएला नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. दुसरीकडे, उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या सुवर्णा मराठे यांनी कडाक्याच्या थंडीत प्रचार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
आम्ही २० वर्षांपासून काम करत आहोत
भाजप असा पक्ष आहे की अन्याय करत नाही म्हणून आम्ही २० वर्षांपासून काम करत आहोत. त्यांनी आमच्यावरती अन्याय केला आहे. आमच्या घराघरात पोहोचलेला माणून होता, त्याला तिकीट दिलेलं नाही, ज्याला कोणी ओळखत नाही, एक काम केलेलं नाही, त्याला यांनी तिकीट दिलेलं आहे. जो माणूस आमच्या कामाचा आहे, त्याचं खच्चीकरण केलं आहे. २० वर्षांपासून त्याला लुबाडलं, असं एका संत्पत महिला कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
मी रात्रंदिवस झटलो, मी भाजपसाठी सगळं बरबाद करून काम केलं
मी २५ वर्षे भाजपचं काम केलं. तुला तिकीट देतो असं दुपारीपर्यंत सांगितलं, आणि त्यांच्या सावेंच्या पीएला तिकीट दिलं. भागवत कराडांनी त्यांच्या जातीच्या माणसाला तिकीट दिलं. त्याला सर्वेत फक्त दोन टक्का सुध्दा नाही. तरी त्याला तिकीट दिली, मी रात्रंदिवस झटलो, मी भाजपसाठी सगळं बरबाद करून काम केलं, मी कचराकुंडीसुध्दा दिली.एकाने जातीचा दिला आणि एकाने पीएला दिलं. ही जनतेची पार्टी होती, आणि त्यांनी जनता सोडली आणि आता ही पार्टी प्रायव्हेड लिमीटेड करून टाकली. यांच्यात दम आहे तर सांगावं, सर्व्हे आणावा, मला त्यांनी अंधारात ठेवलं, मी इतका अन्याय सहन करू शकत नाही. हा सर्वे देवेंद्र फडणवीसांना पाठवा, मी सगळीकडे सर्व्हेमध्ये पुढे असून मला अंधारात ठेवलं, त्यांनी पीएला उमेदवारी दिली. सावेंना हे करून काय भेटलं असा सवालही संतप्त उमेदवारांनी केला आहे.
संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सर्वे दाखवत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. अतुल सावेंना नेमकं काय भेटलं, त्यांनी त्यांच्या पीएला उमेदवारी दिली, त्यांनी फक्त वंजारी लोकांना पुढे केलं, त्यांनी आत्ताच्या आत्ता सर्वे आणावा, जर त्यात माझं नाव नाही आलं तर मी आयुष्यभर त्यांची गुलामी करेन, भागवत कराडांनी फक्त वंजाऱ्यांना तिकीट दिलं, असं म्हणत कार्यकर्त्यांनी अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
