दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे अमेरिकेतून दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी जंतरमंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते.

संभाजीनगर: अवघ्या काही दिवसांतच नावारुपाला आलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके (Abhijit Deepke) आज अमेरिकेतून मायदेशी परतले. त्यावेळी, त्यांनी ठरवल्याप्रमाणे आज सीजेपीचे पहिले आंदोलना दिल्लीतील जंतरमंतर येथे करण्यात आले. नीट पेपरफुटी घोटाळ्यावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत अभिजीत दीपकेंसह त्यांच्या समर्थकांनी देशाचं लक्ष वेधलं. एकीकडे दिल्लीत त्यांच्या आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे कुटुंबीयांना त्यांची काळजी लागून लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीनगरच्या (Sambhajinagar) वाळूज येथील त्यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे अमेरिकेतून दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी जंतरमंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा पोलीस प्रशासनाने आढावा घेतला. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कॉकरोच जनता पार्टीचे जंतर-मंतर आंदोलन संपले
दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन आज सकाळी 10.30 वाजता सुरू झाले होते. सुमारे 3.30 वाजता आंदोलनाची सांगता करण्यात आली असून संपूर्ण जंतर-मंतर परिसर रिकामा करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी आंदोलनस्थळी भेट देत सुमारे 30 मिनिटे उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी भाषण करत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसे न झाल्यास पुढील आठवड्यात देशभरातील इतर शहरांमध्येही आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे.
आंदोलकांना कॉकरोच म्हणून हिणवणे योग्य नाही - उद्धव ठाकरे
“दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोचचे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉकरोच’ म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. NEET पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. कॉकरोच ना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे!, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम























