आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
तुम्ही जेव्हा देशातील तरुणांना अशी उपमा देता, तेव्हा तरुणांच्या मनात असा भाव हा जन्माला येतो आणि यातूनच तरुणांनी अशा प्रकारचा प्रयोग केला आहे.

चंद्रपूर : सोशल मीडियावरुन सुरू झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आता रस्त्यावर उतरुन चळवळ सुरू केली आहे. पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज अमेरिकेहून दिल्लीत पाऊल ठेवलं. दीपकेंच्या नेतृत्वात नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत सीजेपीने आज सकाळी 10 वाजल्यापासून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलंय. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. त्यामुळे, या आंदोलनावर राजकीय (Chandrapur) वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांनीही कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली. सामान्य माणसाचं मन दुखेल अशा शब्दांचा प्रयोग करायला नको. सुप्रीम कोर्टात बोलताना तुम्ही भान ठेवलं नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटलं.
सुप्रीम कोर्टाच्या माननीय न्यायमूर्तींना असं वाटलं की ते जे बोलताय ती छोटी गोष्ट आहे. मात्र, ती छोटी गोष्ट नव्हती, तुम्ही जेव्हा देशातील तरुणांना अशी उपमा देता, तेव्हा तरुणांच्या मनात असा भाव हा जन्माला येतो आणि यातूनच तरुणांनी अशा प्रकारचा प्रयोग केला आहे, असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कॉकरोच जनता पार्टीसंदर्भात आपली भूमिका मांडली. तसेच, अशा प्रकारच्या प्रयोगाला एक योग्य दिशा आणि व्यवस्था लागते आणि अशा प्रकारची दिशा आणि व्यवस्था नसेल तर असा प्रयोग पर्याय ठरत नाही. भाजपने त्याग, तपस्या आणि बलिदानातून ही व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे, सीजेपी काही पर्याय ठरू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सामान्यांचं मन दुखेल असं बोलू नये - मुनगंटीवार
सीजेपीच्या या प्रयोगातून प्रत्येकाने काहीतरी शिकलं पाहिजे की, सामान्य माणसाचं मन दुखेल अशा शब्दांचा प्रयोग करायला नको. सुप्रीम कोर्टात बोलताना तुम्ही भान ठेवलं नाही, त्यातून हा प्रयोग जन्माला आला, त्यामुळे असे प्रयोग कोणाला जन्माला घालू नये याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे, अशी भूमिका सुधीर मुनगंटीवार यांनी कॉकरोच जनता पार्टीबद्दल बोलताना मांडली.
विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगरसेवकांना 5-5 लाख रुपये वाटण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, आज 6 जून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवली होती. त्यांनी पैसे घेतले असेल तर तुम्ही त्यांना निष्ठा शिकवा ना, असे विकाऊ कार्यकर्ते घेऊन पक्ष चालवला जात असेल तर त्याला कोण जबाबदार आहे? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. तसेच, मला अभिमान आहे की आमच्या कार्यकर्त्यांना कोणी मोहात पाडू शकत नाही. आम्हाला दुसरा पक्ष काय करतो याच्याशी काही लेणं देणं नाही. 1952, 1975 मध्ये जे आरोप झाले तेच 2026 मध्ये होत आहेत. त्यामुळे लोकांची मानसिकता कशी बदलवता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. सर्वच पक्षांनी त्यांचे कार्यकर्ते अशा गोष्टींपासून दूर राहावे म्हणून राष्ट्रभक्तीचं व्हॅक्सिन दिलं पाहिजे, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले.
आचारसंहिता म्हणजे शोलेचा नवा गब्बरसिंग
विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे सामान्य लोकांच्या प्रश्नांवर बैठका घेता येत नसल्यामुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा आज संताप दिसून आला. आचारसंहिता म्हणजे शोलेचा नवीन गब्बर सिंग आहे का असं म्हणत या गब्बरसिंगची भीती दाखवत सामान्य लोकांचे प्रश्न देखील सोडवता येत नाही. या निवडणुकीत नगरसेवक हे मतदार आहेत पण ते सामान्य लोकांचे प्रश्न सोडवले म्हणून प्रभावित होतात का? नगरसेवक हे त्या त्या पक्षाचे बांधील आहेत मग मी तर म्हणेल की मग निवडणुकाच का घेता? जसा आपण एखाद्या गटाची शक्ती किती त्या आधारावर को-ऑप देतो, त्याप्रमाणे एक सिस्टीम तयार करा म्हणजे घोडेबाजार पण होणार नाही आणि विधान परिषदेवर सदस्य पण निवडून जातील. तुमच्या मनातल्या इच्छाही पूर्ण होतील आणि कारण नसताना आचारसंहितेचा गब्बरसिंग सामान्य लोकांना त्रास देणार नाही, आचारसंहितेचा गब्बर सिंग त्रास द्यायला लागला तर जनतेतून कधीतरी जय-विरू तयार होणारच आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.
हेही वाचा
Before You Go
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
महत्त्वाच्या बातम्या






















