Swami Govindgiri Maharaj : पंतप्रधान मोदी योग्य दिशेने जाताय, लवकरच ते POK ताब्यात घेतील; स्वामी गोविंदगिरी महाराजांना ठाम विश्वास
Swami Govindgiri Maharaj : या ऑपरेशनला सरकारने सिंदूर नाव दिलं, मी ज्यावेळेस ते वाचलं तेव्हा माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं, असंही स्वामी गोविंदगिरी महाराजांनी म्हटले आहे.

Swami Govindgiri Maharaj on PM Narendra Modi: पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने कठोर आणि ठाम प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी ठिकाणांचा यशस्वीपणे नायनाट करण्यात आला. यानंतरही पाकिस्तानने आपली नापाक कृती सुरूच ठेवली आणि भारतातील नागरी भागांवर लक्ष्य करत हल्ले चढवले. मात्र भारताने प्रत्येक वेळेस ठाम प्रत्युत्तर देत पाकिस्तानला माघारी पळवले. भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी झाली होती. या कारवायांमुळे दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं आणि युद्ध पेटण्याची शक्यता होती. तीन दिवस चाललेल्या तीव्र संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी शस्त्रविरामावर सहमती झाली. पाकिस्तानकडून (Pakistan) शस्त्रविरामाचा प्रस्ताव आल्यावर ही सहमती लागू करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार टीका केली. आता स्वामी गोविंदगिरी महाराजांनी (Swami Govindgiri Maharaj) युद्धबंदीवरील टीकेवरून विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. मोदींच्या निर्णयाला विरोध करणारे लोक पाकिस्तान धार्जिणे व परकीय लोकांचे हस्तक आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
स्वामी गोविंद गिरी महाराज हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे असून अयोध्येतील श्रीराम मंदिराचे महंतही आहेत. काल बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील इसरुळ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यानंतर माध्यमांशी बोलताना स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले की, नरेंद्र मोदींनी जरी युद्धबंदीचा निर्णय घेतला तर तो देश हिताचाच आहे. मात्र विरोधकांनी मोदींच्या निर्णयावर टीका केली. त्यामुळे विरोधक हे पाकिस्तान धार्जिणे असून परकीय लोकांचे ते हस्तक आहेत. त्यांचे बोलवते धनी सुद्धा परकीयच आहेत, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे.
पंतप्रधान मोदी लवकरच ते POK ताब्यात घेणार
स्वामी गोविंदगिरी महाराज पुढे म्हणाले की, गेली 70 वर्ष आपण मार खात आलोय, मात्र आता नाही. आताच्या शासनाच्या मस्तकात शिवाजी महाराजांचे विचार व शिवाजी महाराजांचे चरित्र बसलेलं आहे. त्यामुळे यापुढे आपण जिंकत जाणार आहोत. या ऑपरेशनला सरकारने सिंदूर नाव दिलं, मी ज्यावेळेस ते वाचलं तेव्हा माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. यापेक्षा अधिक चांगलं नाव असूच शकत नाही. नरेंद्र मोदींना भेटल्यावर मी त्यांना हे नाव कोणी दिलं? असे विचारणार आहे. यापेक्षा दुसरं कुठलं समर्पक नाव असूच शकत नाही. मी सरकारचं या ऑपरेशनबद्दल अभिनंदन करतो. तीन दिवसाच्या युद्धानंतर झालेली युद्धबंदी म्हणजे काही शेवट नाही. हा स्वल्पविराम असून पूर्णविराम नाही हे विरोधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करतो. ते अतिशय योग्य मार्गाने चालले आहेत. ते देशाला योग्य मार्गावर नेतील व लवकरच POK देशात सामील करतील, याची मला खात्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा
























